Thursday, September 24, 2020

पत्रकारांसाठी 50 लाखांचे विमा कवच लागू करा.परळी पत्रकार संघाचे राज्य सरकारला निवेदन.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ; कोरोनाच्या काळात जनतेच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी राज्यातील पत्रकार अहोरात्र मेहनत घेत आहेत. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेली पत्रकारिता मात्र सुरक्षित नसल्याचे सध्या दिसते आहे. गेल्या पाच महिन्यांत कोरोनाने अनेक पत्रकारांना आपला जीव गमवावा लागल्याने त्यांचे कुटुंब संकटात सापडले आहेत. या बाबीची दाखल घेऊन शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पत्रकारांना राज्य सरकारने 50 लाखांचे विमा कवच लागू करावे अशी मागणी परळी पत्रकार संघाच्या वतीने राज्य सरकारला करण्यात आली. याबाबतचे निवेदन बुधवारी तहसीलदार परळी यांना देण्यात आले आहे.

कोरोनाचा संसर्ग झाल्याने मागील काळात अनेक पत्रकारांना जीव गमवावा लागला आहे. पत्रकारिता हा व्यवसाय नसून तो पेशा आहे. समाजाच्या भल्यासाठी मेहनत घेणाऱ्या पत्रकारांच्या सुरक्षेसाठी शासनाची कुठलीही योजना अस्तित्वात नाही. जीव गमावल्याने त्यांच्या कुटुंबियांवर मोठे संकट ओढवते. राज्यात कोरोनाने 50 पेक्षा जास्त पत्रकारांनी आपला जीव गमावला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पत्रकारांनाही विमा योजना लागू करू अशी घोषणा आरोग्य मंत्र्यांनी केली होती, मात्र अद्यापही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे शासनाने सदरील गोष्टीला गांभीर्याने घेऊन पत्रकारांना तात्काळ विमा कवच लागू करावे अशी मागणी परळी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली आहे. तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री ना.धनंजय मुंडे, जिल्हाधिकारी बीड यांना देण्यात आले आहे. सदरील निवेदन नायब तहसीलदार बी.एल.रूपनर यांनी स्वीकारले. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष संभाजी मुंडे, कार्याध्यक्ष धीरज जंगले, दत्तात्रय काळे, महादेव गित्ते आदी उपस्थित होते. या निवेदनावर परळीतील सर्व पत्रकारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

No comments:

Post a Comment