Sunday, April 30, 2023
छ.शिवाजी महाराज कामगार सेनेच्या पाठपुरावामुळे नवी मुंबई महानगर पालिके च्या घंटागाडी कामगारांना मिळाला थकीत पगार.
मिरवट येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास उत्साहात प्रारंभ.
हॉस्पिटलच्या ‘त्या’ खात्याचा गैरवापर नको वैद्यकीय शिक्षण विभागाच्या मेडिकल कॉलेजांना सूचना.
मुंबई -(प्रतिनिधी) वैद्यकीय शिक्षण विभागाच्याअखत्यारीतील वैद्यकीय महाविद्यालयाशी संबंधित रुग्णालयांत असणाऱ्या पीएलए (स्वीय प्रपंजी ) खात्यात कोट्यवधी रुपये रुग्णालयातील विविध शुल्काच्या आधारे जमा होत असतात. या खात्यातील रक्कम काही विशिष्ट कारणासाठी वापरणे अपेक्षित असते. मात्र, काही रुग्णालयांत नियमाचे पालन होत नसल्याचे विभागाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे विभागाने या खात्यातील निधी वापरण्याबाबत पहिल्यांदाच मार्गदर्शक सूचना सर्व महाविद्यालयांसाठी काढल्या आहेत. तसेच या निधीच्या खर्चाबाबत काही अनियमितता आढळल्यास कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
राज्यात वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीत २३ वैद्यकीय महाविद्यालयाशी संबधित रुग्णालये आहेत. तसेच दंत वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांचा यात समावेश आहे. या सर्व रुग्णालयांत आणि महाविद्यालयांत पीएलए खाते असते. ज्यामध्ये महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क व इतर शुल्क, सुरक्षा अनामत रक्कम, जिमखाना शुल्क, विकास निधी, वसतिगृह शुल्क यासोबत रुग्णालयामध्ये जमा होणारे आंतररुग्ण शुल्क, बाह्यरुग्ण शुल्क, प्रयोगशाळा फी जमा होत असते. मात्र, या खात्यातील रक्कम वापरण्यासाठी वित्तीय विभागाने काही नियम आखून दिले आहेत. काही महाविद्यालयांत यांचे पालन न केल्याचे निदर्शनास आले आहे. काही वर्षांपूवी काही महाविद्यालयांच्या अधिष्ठातांनी त्यांना दिलेल्या अधिकारापेक्षा जास्त निधीचा वापर केल्याचे निदर्शनास आले होते. त्याशिवाय योग्य कारण नसतानाही निधी खर्च केला होता. या नवीन मार्गदर्शक सूचनांमुळे या सगळ्या गोष्टींना चाप बसेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच रुग्णांचा व विद्यार्थ्यांचा पैसा योग्य कारणासाठी वापरला जाईल.
प्रत्येक महाविद्यालयाच्या विद्यार्थी आणि रुग्ण संख्येच्या क्षमतेनुसार हा निधी महिन्याकाठी किती वापरावे याचे काही निकष आहेत. काही महाविद्यालयांना महिन्याला ३० लाख ते १० लाख रुपये इतका निधी खर्च करण्याची परवानगी आहेत. मात्र, या खर्चाची अत्यंत गरज असल्यास करावा.
या खात्यात वेतन, निवृत्ती वेतन व भत्ते या कोणत्याही रकमा या खात्यात ठेवू नये. तसेच ५००० रुपयांवरील सर्व खर्च ईसीएस किंवा एनईएफटी द्वारे करावा. तसेच हे खाते तपासणीकरिता तपासणी पथक निर्माण करण्यात आले आहे. त्यांच्याकडून वेळेच्या वेळी तपासणी करून घ्यावी.
तसेच या खात्याचे वेळच्या वेळी ऑडिट करून घेणे. या खात्यासंदर्भातील कुठलीही वित्तीय अनियमितता आढळून आल्यास संबंधित अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असेही मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे.
नवोदयच्या परीक्षेत शिक्षकांच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्याला गुजराती पेपर बीडमध्ये धक्कादायक प्रकार.
आमच्या प्रतिनिधींनी मुख्याध्यापक राम वाघुंबरे यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी शाळेत कर्मचारी वर्ग कमी असल्याचे कारण दिले. या प्रकाराला शिक्षक जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले. आमच्या शाळेत शेकडो विद्यार्थी आहेत. मात्र शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या अगदीच कमी आहे. विद्यार्थ्याला १५ दिवसांपूर्वी हॉल तिकीट मिळाले होते. त्यामुळे त्यांनी हा प्रकार आधीच निदर्शनास आणून द्यायला हवा होता, असं वाघुंबरे म्हणाले.
Friday, April 28, 2023
मा. आ.कै.अण्णाभाऊ गित्ते यांच्या पत्नी श्रीमती सूजानबाई गित्ते यांचे निधन.
कें नुतन परळी चे केंद्रीय मुख्याध्यापक मोहन कांबळे व जि प प्रा शा वाघबेट शाळेचे मुख्याध्यापक भगवान राठोड यांचा सेवानिवृत्ती निम्मित निरोप समारंभ संपन्न.
परळी वैद्यनाथ रत्न पुरस्कार 2023 जाहिर भव्य दिव्य गौरव सोहळ्याचे होणार आयोजन.
वादळीवाऱ्यासह पावसात अडकलेल्या शेतकऱ्यावर वीज कोसळली, जागीच मृत्यू
केज (प्रतिनिधी) : तालुक्यातील केळगाव शिवारात आज दुपारी (दि. २८) १२ वाजेच्या दरम्यान झालेल्या वादळी पावसात वीज अंगावर कोसळून एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. बिभीषण आण्णासाहेब घुले ( 50) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
शेतकरी बिभीषण आण्णासाहेब घुले हे आपल्या शेळ्या शेतात चारत होते. दुपारी 12 वाजता वातावरण बदलून मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस सुरु झाला. दरम्यान, अचानक घुले यांच्यावर वीज कोसळली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्च्यात पत्नी, 1 मुलगा, 3 मुली असा परिवार आहे. घटनास्थळी पोलीस नाईक राजू गुंजाळ यांनी भेट दिली असून पंचनामा करून पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी केज येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
तसेच गुरुवारी मध्यरात्री 1 वाजेच्या दरम्यान झालेल्या अवकाळी पावसात काळेगावघाट शिवारात महालिंग शिवलिंग तांगडे यांच्या शेतातील गोठ्यावर वीज कोसळून एक बैल ठार झाला आहे, तर एक बैल होरपळला. तलाठी सोनुने आणि पशुधन विकास अधिकारी डॉ दीक्षांत जोगदंड आणि पशुधन पर्यव्यक्षक यादव यांनी घटनास्थळी भेट देऊन मयत बैलाची उत्तरीय तपासणी करून पंचनामा केला आहे.
Thursday, April 27, 2023
सोशल मीडियाचा प्रभावी वापर; हरवलेल्या ८२ वर्षीय वृद्धेची अन् नातेवाईकांची झाली भेट.
*सोशल मिडीयाच्या प्रभावी वापराने अवघ्या दोन तासांत वृद्धेची माहिती मिळून नातेवाईकांची भेट झाली.
दिंद्रुड (प्रतिनिधी): नातेवाईकांच्या भेटीसाठी बसने मुंबईहून माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथे निघालेली ८२ वर्षीय वयोवृद्ध महिला दोन दिवसांपूर्वी हरवली होती. मात्र, सोशल मिडीयाच्या प्रभावी वापराने या ८२ वर्षीय वृद्धेची अन तिच्या मुलाची आज सकाळी भेट झाली. रमाबाई बाबुराव पाटील असे वृद्ध महिलेचे नाव आहे. सोशल मिडीयाच्या प्रभावी वापराने अवघ्या दोन तासांत वृद्धेची माहिती मिळून नातेवाईकांची भेट झाली.
रमाबाई पाटील या १९८० साली दिंद्रुडहून मुंबईला राहायला गेल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी दिंद्रुड येथील नातेवाईकांना भेटण्यासाठी रमाबाई पनवेल येथून बसने माजलगावकडे निघाल्या. माजलगाव गाडीत बसलेल्या रमाबाई मात्र दिंद्रुडला पोहचल्याच नाही. नातेवाईकांनी सर्वत्र शोधा शोध केली मात्र त्या कुठेही आढळून आल्या नाहीत. विशेष म्हणजे, त्यांच्याकडे मोबाईल नसल्याने संपर्क करण्यात अडचण आली.
दरम्यान, मुंबई येथील कामोठा पोलीस स्टेशन हद्दीत पोलिसांना गुरुवारी सकाळी रमाबाई आढळून आल्या. पोलिसांनी माहिती विचारली असता त्यांस सांगता आली नाही. मात्र, त्यांच्याजवळ पनवेल ते माजलगाव व माजलगाव ते दिंद्रुड असे एसटी बसचे तिकीट सापडले. या तिकिटावरून कामोठा पोलिसांनी दिंद्रुड पोलिसांशी संपर्क साधला. दिंद्रुड पोलिसांनी रमाबाई यांच्या नातेवाईकांचा शोध सुरु केला. याबाबत पोलिसांनी स्थानिक पत्रकारांना माहिती दिली.
दिंद्रुड येथील पत्रकार संतोष स्वामी, नवनाथ कांबळे, गणेश काटकर यांनी सोशल मीडियाचा माध्यमातून अवघ्या दोन तासांत रमाबाई यांच्या दिंद्रुड येथील नातेवाईकांचा शोध लावला. योगेश राडकर व अमोल नागापुरे या नातेवाईकांनी लागलीच त्यांच्या मुलाचा व मुलीचा संपर्क देत पत्ता सांगितला. त्यानंतर पोलिसांनी मुलगा प्रशांत पाटील याच्यासोबत संपर्क केला. कामोठा पोलिसांनी रमाबाई यांना मुलाकडे सोपवले. पाटील परिवाराने कामोठा पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल आगलावे, दिंद्रुड पोलीस स्टेशनचे हेडकॉन्स्टेबल बालाजी सूरेवाड तसेच दिंद्रुड येथील पत्रकारांचे आभार व्यक्त केले.
अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या पोलिसाच्या टिप्परने पोलिसालाच उडविले, प्रकृती चिंताजनक.
*बीड शहरातील घटना : वाळू टाकून परत भरधाव वेगात जाताना दुचाकीला दिली धडक.
बीड (प्रतिनिधी) : अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव टिप्परने पाेलिस कर्मचाऱ्याच्या दुचाकीला धडक दिली. यात हा कर्मचारी गंभीर जखमी झाला असून खासगी रूग्णालयात मृत्यूशी झुंज दत आहे. ही घटना गुरूवारी दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास बीड शहरातील नगर नाका येथे घडली. दरम्यान, हे वाळूचे टिप्पर एका पोलिस कर्मचाऱ्याचे असल्याचे सांगण्यात येत आहे. ते सध्या शिवाजीनगर पोलिसांनी ठाण्यात नेले आहे.
कृष्णा रूपणर असे या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. मागील दहा दिवसांपूर्वी रूपनर हे अमरावतीवरून बीडला बदलून आले होते. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना ते सुरक्षा रक्षक म्हणून कर्तव्य बजावत होते. गुरूवारी दुपारी ते जेवणासाठी घरी जात होते. याचवेळी विना क्रमांकाच्या भरधाव आलेल्या टिप्परने रूपनर यांच्या दुचाकीला (एमएच ४४ एक्स ०३७३) धडक दिली. यात पाच ते दहा फुटापर्यंत दुचाकी फरटत नेली. यात पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले. त्यानंतर वाहतूक शाखेचे सहायक फौजदार सोडगिर व त्यांच्या पथकाने त्याला आपल्या वाहनातून रूग्णालयात दाखल केले. रूपनर यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. धडक देणारा टिप्पर पोलिसांनी शिवाजीनगर ठाण्यात नेला आहे.
अवैध वाळू वाहतूक कधी थांबणार?रूपनर यांना धडक दिलेल्या टिप्परमधील वाळू खाली करून ते भरधाव वेगाने मिनी बायपास रोडने जात होते. यातच पोलिस कर्मचाऱ्याला धडक दिली. त्यानंतर चालक पसार झाला. दरम्यान, यापूर्वीही अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांनी अनेकांचा जीव घेतलेला आहे. आता ही मालिका कधी थांबणार? प्रशासनाला कारवाई करण्यासाठी आणखी किती लोकांचा बळी घ्यायचा आहे? असा सवाल उपस्थित होत आहे.
प्रकरण मिटविण्यासाठी दबाव.
अपघातातील टिप्परवर कसलाही नंबर नसला तरी सूत्रांच्या माहितीनुसार ते पोलीसाचेच असल्याचे सांगण्यात आले. हे प्रकरण वाढू नये, यासाठी जखमी कर्मचाऱ्यावर दबाव आणला जात आहे. गुन्हा दाखल न करता सर्व खर्च देऊ, असे प्रलोभण दिले जात आहे. तसेच एका वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यानेही नियंत्रण कक्षाला हे प्रकरण मिटल्याची नोंद घ्या, असा संदेश दिल्याची माहिती आहे.
पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड.१ लाख ८३ हजारांचा मुद्देमाल जप्त.६ जण ताब्यात.
शासनाला कोट्यावधीचा गंडा घालणाऱ्या 'त्या' शाळेची अखेर मान्यता रद्द
याच शाळेतील शिक्षकांसह सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे यांनी संस्थेत सुरु असलेल्या चुकीच्या प्रकाराची तक्रार दिली होती. तसेच त्यांनी वेळोवेळी आंदोलन देखील केले.दरम्यान काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषद सीईओ अजित पवार यांनी शाळेचे मुख्याध्यापक वनवे प्रविण लिंबाजी यांना निलंबित केले होते.
आता महाराष्ट्र शासनाचे कक्ष अधिकारी अजित जगताप यांनी या शाळेची मान्यताच रद्द केलीय. त्यामुळं शासनाच्या अनुदानावर डल्ला मारणाऱ्या संस्थाचालकांमध्ये चांगलीचं खळबळ उडाली आहे.
धक्कादायक! परळीतील लेंडेवाडी शिवारात रेल्वेरुळाजवळ आढळला परप्रांतीय महिलेचा मृतदेह.
*मृतदेहाजवळ एक पर्स सापडली असून त्यात एक मोबाईल आणि ओळखपत्र सापडले आहे.
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : येथील लेंडेवाडी शिवारातील रेल्वेरुळाजवळ.आज सकाळी 23 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला. ओळखपत्रावरून महिला परराज्यातील असल्याचे समजते.
मृत महिलेच्याजवळ एक बॅग आढळून आली आहे. बॅग ( पर्स) मध्ये एक मोबाईल व पॅन कार्ड सापडले आहे. पॅन कार्डवरून त्या महिलेचे नाव हरीनी एटी असे असून वय 23 असल्याची माहिती परळी ग्रामीण पोलिसांनी दिली. ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मणराव टोले, पोलीस कॉन्स्टेबल घरत, परतवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. दरम्यान, पर्समध्ये सापडलेल्या मोबाईलवरून महिलेच्या नातेवाईकांचा पोलीस शोध घेत आहेत. महिलेचे मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस पुढील तपास करत आहेत.
मी सांगूनही ट्रॅक्टर सोडले नाही. आमदारांच्या पीएकडून पोलिसाला शिवीगाळ.
*पोलीस कर्मचाऱ्याच्या दुचाकीची चावी घेत, चल आमदार साहेबांकडे, मी कोण आहे तर सांगतो, असे म्हणत अरेरावी केली.
बीड (प्रतिनिधी) : मी सांगितलेले ट्रॅक्टर का सोडले नाहीस, असे म्हणत आष्टीतील राष्ट्रवादीचे आ.बाळासाहेब आजबे यांच्या पीए ने पोलिस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली. तसेच दुचाकीची चावी काढून घेत त्यांना कर्तव्यावर जाण्यापासून रोखले. ही घटना २५ एप्रिल रोजी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास पाटोदा तालुक्यातील पिंपळवंडी येथे घडली. याप्रकरणी पीए विरोधात अंमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सुनिल पारखे असे या पीएचे नाव आहे.
२३ एप्रिल रोजी अंमळनेर ठाण्याचे पोलिस कर्मचारी जालिंदर बनसोडे यांनी एक ट्रॅक्टर पकडला होता. तो सोडण्यासाठी पारखे यांनी कॉल केला होता. तरीही ट्रॅक्टर न सोडल्याने २५ एप्रिल रोजी सकाळी त्यांनी पिंपळवंडीत आल्यावर बनसोडे यांच्यासोबत हुज्जत घातली. त्यांच्या दुचाकीची चावी घेत, चल आमदार साहेबांकडे, मी कोण आहे तर सांगतो, असे म्हणत अरेरावी केली. दरम्यान, पीए सुनिल पारखे यांनी हे आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे. शेती कामासाठी जाणारे ट्रॅक्टर पकडले तेव्हा अंमळनेर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना बोललो होतो. मी या कर्मचाऱ्याला ओळखतही नाही. आपण आमदारांचा पीए आहोत, हे खरे असल्याचेही ते म्हणाले.
Wednesday, April 26, 2023
बीड जिल्हा परिषद विभागाच्या औषधी भांडारमध्ये कर्मचाऱ्याचा राड.फार्मसी ऑफिसरच्या केबिनची तोडफोड.
बीड (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद विभागाच्या औषधी भांडार विभागात क्षयरोग कार्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्याने राडा केला. फार्मसी ऑफिसरच्या केबीनच्या काचा फोडण्यासह इतर साहित्याचीही तोडफोड केली. ही घटना बुधवारी पाच वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी बीड शहर ठाण्यात नोंद झालेली नाही.
जिल्हा रूग्णालयाच्या पाठिमागील बाजूस जिल्हा परिषदेचे औषधी भांडार आहे. येथे कोट्यवधी रूपयांची औषधी साठा असतो. बुधवारी ५ वाजेच्या सुमारास क्षयरोग विभागातील एक कंत्राटी कर्मचारी तेथे आला. त्याने शिपायांसह फार्मासिस्ट सोबत वाद घातले. त्यानंतर आतमध्ये जात फायबरच्या दरवाजावर लाथा मारून तो वाकविला.
तेथून फार्मसी ऑफिसर योगेश जोशी यांच्या कक्षाच्या दरवाजाचा काचा फोडल्या. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी भांडार विभागात धाव घेतली. सर्व परिस्थितीचा आढावाही घेतला. परंतू सायंकाळी ७ वाजेपर्यंत याप्रकरणात बीड शहर पोलिस ठाण्यात याची नोंद झाली नव्हती.
कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक मातब्बरांची प्रतिष्ठा पणाला. २२ हजार ५६२ मतदार निवडणार बाजार समित्या तील कारभारी.
नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
परळीत मुंडे बहीण भावांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. तर बीडमध्ये क्षीरसागर काका पुतण्याची प्रतिष्ठा पणाला लागलीय. यामध्ये सर्वपक्षीयांकडून जयदत्त क्षीरसागर यांनी चितपट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर गेवराईमध्ये राष्ट्रवादीचे नेते अमरसिंह पंडित आणि भाजपचे आमदार लक्ष्मण पवार, शिवसेना नेते बदामराव पंडित यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. माजलगावमध्ये राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळुंके यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.
शिक्षण क्षेत्रातून धक्कादायक घटना.!नाट्यशास्त्र विभागातील प्राध्यापकाने विद्यार्थिनीवर केला अत्याचार.
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) रा ज्यात पुन्हा: एकदा शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली असून, या नराधक गुरूने सर्व हद्दच पार केल्याचं समोर आलं आहे. सदर घटना हि, छत्रपती संभाजीनगरमधून समोर आली असून, शहरातील एका महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर सहाय्यक प्राध्यापकानेच बलात्कार केल्याची घटना आहे. वसतिगृहात राहणे सुरक्षित नसल्याचे सांगत; एका नराधम सहाय्यक प्राध्यापकाने पीडित विद्यार्थिनीला घरी पेईंग गेस्ट म्हणून नेले . मात्र घरी राहण्यासाठी नेऊन तिच्यावर सहाय्यक प्राध्यापकाने बलात्कार केला. विशेष म्हणजे या कृत्यात सहाय्यक प्राध्यापकाच्या पत्नीचाही सहभाग असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सहाय्यक प्राध्यापक आणि त्याच्या पत्नीने संगनमताने माझ्यावर बेशुद्ध पडेपर्यंत अत्याचार केल्याचा धक्कादायक आरोप पीडित मुलीने केला आहे.
अशोक गुरप्पा बंडगर असे नराधम आरोपी सहाय्यक प्राध्यापकाचे नाव असून, तो नाट्यशास्त्र विभागात नोकरीला आहे. तर या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात बंडगर पती-पत्नीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 वर्षीय पीडिता बाहेरील जिल्ह्यातून छत्रपती संभाजीनगर शहरात शिक्षणासाठी आली होती, आणि तिने शहरातील एका महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता. यादरम्यान एका सर्व्हिस कोर्सनिमित्त तिची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक अशोक गुरप्पा बंडगरसोबत ओळख झाली होती. तर विद्यापीठाबाहेरील महाविद्यालयाची विद्यार्थिनी असूनही बंडगरने मार्गदर्शन, सल्ला देण्याच्या बहाण्याने तिच्याशी जवळीक वाढवायला सुरुवात केलो. या काळात त्याने मी तयार करत असलेल्या चित्रपटात तुलाही काम करण्यासाठी संधी देतो, असे म्हणत आणखी जवळीक निर्माण केली.
पुढे आणखी जवळीक वाढवण्यासाठी; या नराधमाने पवित्र नात्याचा आधार घेत.! हे घाणेरड कृत्य केलं.
काही दिवसांपूर्वी पीडित तरुणीला बाहेर खोलीवर राहणे अशक्य झाल्याने तिने होस्टेलचा शोध सुरु केला. मात्र तिने निवडलेले होस्टेल सुरु झाले नसल्याने तिच्या राहण्याची अडचण होऊ लागली. त्याचदरम्यान तिची विद्यापीठ परिसरात बंडगरची भेट झाली आणि बोलता-बोलता तिने हा प्रकार त्याला सांगितला. यावेळी बंडगरने तिला वडिलकीच्या नात्याने घरी चल, असे सांगून घरी नेले. त्याच्या पत्नीनेही पीडितेला, 'होस्टेल सुरक्षित नसतात, तू आम्हाला मुलीसारखीच असून, पेईंग गेस्ट म्हणून राहण्यासाठी आग्रह केला. मुलीचा दर्जा दिल्याने मोठ्या विश्वासाने पीडिता पेईंग गेस्ट म्हणून बंडगर दाम्पत्याकडे राहायला लागली. मात्र पुढे काही दिवसांनी बंडगरने तिच्या जवळ जाण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे त्याचे वागणे विचित्र वाटल्याने पीडितेने त्याला अनेकदा दूर राहण्यास सांगितले. दरम्यान पीडित मुलीवर घराची सर्व आर्थिक जबाबादारी देऊन, नंतर बंडगरने चोरीचा आळ घेऊन जुलैमध्ये तिच्यावर अत्याचार केला. पुढेही धमकावत वारंवार अत्याचार करत राहिला. हा सर्व प्रकार पीडितेने त्याच्या पत्नीला सांगितला. मात्र, 'मला मुलगा नाही. तू आता माझ्या पतीसोबत लग्न कर. आम्हाला मुलगा हवा आहे,' असे म्हणत बंडगरच्या पत्नीनेही तिला धमकावले. तसेच बंडगरची पत्नीदेखील पतीच्या कृत्याला समर्थन देत गेली. धक्कादायक म्हणजे जानेवारी 2023 मध्ये दोघे पती-पत्नीने त्यांच्या खोलीत नेऊन पीडित मुलीवर बेशुद्ध पडेपर्यंत अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान मुलीची प्रकृती बिघडल्याचे कळल्यानंतर पीडितेचे वडील आणि बहिणीने तिला गावाकडे नेले. त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आणि विद्यापीठ प्रशासनाने पीडितेला बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास सांगितल्यानंतर मंगळवारी यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वसई-विरार महापालिका मुख्यालया समोर (ठाकरे) शिवसेनेचा ठिय्या ! पाणी आरोग्यासह अन्य समस्यांवर शिवसैनिक पुन्हा आक्रमक.
Tuesday, April 25, 2023
पुणे-लातूर-पुणे रेल्वे सेवा सुरू होणार. सोलापूर, उस्मानाबाद, लातूरकरांना मोठा दिलासा.
माजलगाव शहरातील त्या वादग्रस्त सर्व्हे नंबरची मोजणी सुरू. कागदावरील शासकीय जमीन खुली होण्याची जनतेची अपेक्षा.
माजलगाव (प्रतिनिधी): शहरातील बायपास रोड (आझाद चौक) परिसरातील सर्व्हे नं. ३७०, ३७१, ३७२ या वादग्रस्त सर्व्हे नंबरची शासकीय मोजणीस अखेर भूमिअभिलेख कार्यालयाकडून सोमवारी दुपारी १२ वाजता सुरुवात झाली आहे. या सर्व्हे नुंबरमध्ये शासनाची १३ एक्कर ३४ गुंठे जमीन असून त्यातील केवळ ३७ गुंठे जमीन ताब्यात आहे, तर उर्वरित १३ एक्कर जमिन अनेक भूमाफियांनी गिळकृत केलेली आहे.

या तीनही सर्वे बाबत मागील १०-१२ वर्षात वादग्रस्त असून खाजगी मोजण्यांमध्ये कुठलेही क्षेत्र कुठेही काढल्या जावुन येथे असणा-या शासनाच्या जमीनीला देखील धक्का पोहचवला आहे. नगर परिषदेने वारंवार मागणी करुनही भुमिअभिलेख कार्यालयाकडुन टाळाटाळ होणारी शासकिय मोजणी अखेर सोमवारी दुपारी १२ वाजता सुरू झाली आहे. या मोजनिमधून हेराफेरी करणाऱ्यांचे पाप समोर येणार असल्याने अनेकांचे धाबे दणानले आहेत.
१३ एक्कर ३४ गुंठे पैकी शासनाची १ एक्करच जमिन ताब्यात
सर्व्हे नंबर ३७०, ३७१, ३७२ मध्ये शासन व माजलगाव नगर परिषदची १३ एक्कर ३४ गुंठे जमीन आहे. त्यापैकी सर्व्हे नं.३७२ मध्येच केवळ ३७ गुंठे नगर परिषदच्या ताब्यात असल्याचे बोलले जाते तर उर्वरित १२ एक्कर ३७ गुंठे जमीन गायब आहे.
अशी आहे सर्व्हे नं. प्रमाणे शासकीय जमीन
सर्व्हे नं. ३७० मध्ये ४ एक्कर आहे, त्यात केवळ ३७ गुंठे जमीन नगर परिषदेच्या ताब्यात आहे. त्यातील १ एक्कर ३ गुंठे जमीन गायब आहे. सर्व्हे नं.३७१ मध्ये ७ एक्कर ३४ गुंठे व सर्व्हे नं.३७१ मध्ये २ एक्कर ही जमीन गायब आहे.
उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत शिवसेना ठाकरे गट आघाडी तून बाहेर.
*शिवसेना ठाकरे गटाने पत्रकार परिषद घेऊन आम्ही आघाडीतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली आहे.
उदगीर (प्रतिनिधी) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकाणी धुमाकूळ घातल आहे. अनेक राजकीय पक्षांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आपले उमेदवार रींगणात उतरवले आहे.बाजार समितीच्या निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग आला असताना लातूरच्या उदगीर कृषी उत्पन्न बाजार बाजार समितीच्या निवडणूकीसाठी शिवसेना ठाकरे गटाने आघाडीतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, लातूरच्या उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीसाठी शुक्रवारी मतदान होत आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष ठाकरे गटाने काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच ठाकरे गटाने गंभीर आरोप करत महाविकास आघाडीच्या प्रचारातून स्वतःला वेगळे ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे जाहीर केले आहे.
निवडणुकीसााठी अनपेक्षित आघाडी अस्तित्वात आली. यात शिवसेना ठाकरे गटाला महाविकास आघाडीतून वगळण्यात आले. निवडणुकीत शिवसेनेकडून २ जागांसाठी मागणी करण्यात आली होती. परंतु उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी झालेल्या राजकीय घडामोडी मध्ये शिवसेनेला वगळण्यात आले. सोमवारी दुपारी उदगीर येथे शिवसेना ठाकरे गटाने पत्रकार परिषद घेऊन बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेना अलिप्त राहणार असल्याचे जाहीर केले.
दुर्दैवी घटना! एका दिवसावर रिटायरमेंट असलेल्या प्राध्यापकाचा अपघाती मृत्यू .
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, नाशिकसह जिल्ह्यात अपघातांच्या घटनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दिंडोरी तालुक्यातील वलखेड फाटा परिसरात असताना दिंडोरीकडे येणारी पिकअप आणि अल्टो कार यांची समोरासमोर जोरदार धडक बसली. त्याचवेळी पिकअपच्या मागून येणारी मोटरसायकल अल्टो कारला येऊन धडकली.
अपघातात प्राध्यापक शिंदे यांच्या डोक्याला आणि छातीला जबर मार लागला. त्याचबरोबर पिकअप चालक सागर पेलमहाले आणि विठ्ठल पागे हे सुद्धा जखमी झाले आहेत. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्राध्यापक शिंदे यांना जबर मार लागल्याने आणि रक्तस्त्राव अधिक झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
प्राध्यापक रामदास शिंदेवणी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. कार्यकाळ संपल्याने ते सेवानिवृत्त होणार होते. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी शिंदे हे नाशिकवरुन वणीकडे आपल्या अल्टो कारने निघाले होते. याप्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात अकस्मात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
व्यवसायाच्या वादातून दोन गटामध्ये तुफान हाणामारी करत कट्ट्यातून गोळीबार.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. 2 मध्ये व्यवसायाच्या वादातून दोन गट आमने-सामने आले. यात दोघा - तिघांना बेदम मारहाण करण्यता आली. यातील एका गटातील एकाने गावठी कट्टा काढत गोळीबार केला. सुदैवाने कुणाला गोळी लागली नसली तरी परिसरातील वातावरण मात्र तणावाचे होते.
घटनेची माहिती कळताच पोलिसांनी फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. दोन्ही गटातील तरूणांची धरपकड सुरू केली. पोलिसांना या प्रकरणी एकास ताब्यात घेतले असून जखमी असल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. शहरात काही भागात तणावाचे वातावरण पसरल्याने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
चोरट्यांनी महिलांच्या डोक्यात दगडाने लोखंडी रॉडने केला हल्ला. घटनेत २ महिला गंभीर जखमी.
कुटुंबीय मंदिरातील सप्ताहात मग्न मुलाचा तलावाच्या पाण्यात बुडुन मृत्यू.
मोठी बातमी! जिल्हाधिकाऱ्यांनी काढले पत्रक धाराशिव नव्हे उस्मानाबादच.
*काही दिवसांपूर्वीच उस्मानाबादचं नामांतर धाराशिव करण्यात आलं आहे. मात्र आता पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांकडून पत्रक काढण्यात आलं आहे.
धाराशिव (प्रतिनिधी) : काही दिवसांपूर्वीच उस्मानाबादचं नामांतर धाराशिव आणि औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं आहे. मात्र आता या नामांतरावर आक्षेप घेण्यात येत आहे. उस्मानाबादच्या नामांतराविरोधात मुंबई उच्च न्यायालयात रीट याचिका दाखल करण्यात आली आहे. सध्या या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. त्यामुळे न्यायालयाचे पुढील आदेश येईपर्यंत सरकारी कार्यलयांनी उस्मानाबाद नावात बदल करू नयेत असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत. याबाबत एक पत्रक जिल्हाधिकारी कार्यलयाकडून काढण्यात आलं आहे.
कार्यालयीन नावात बदल.
उस्मानाबादचे नामांतर धाराशिव करण्यास केंद्र आणि राज्य शासनाकडून मान्यता मिळाल्यानंतर काही सरकारी कार्यालयांनी देखील नावात बदल केला होता. मात्र उस्मानाबादच्या नामांतराविरोधात मुंबई उच्च न्यायालयात रीट याचिका दाखल करण्यात आली आहे. अद्याप या प्रकरणावर सुनावणी सुरू असताना सरकारी कार्यालयांनी जिल्ह्याच्या नावात बदल केल्याची बाब याचिकाकर्त्याच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच पत्रक
त्यावर उच्च न्यायालयाने पुढील आदेश येईपर्यंत महसूल व इतर विभागाने संबंधित कोणत्याही कार्यालयाच्या नावात बदल करू नये अशी निर्देश दिले आहेत, कोर्टाच्या या आदेशाचा संदर्भ देत जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी 22 एप्रिल रोजी सर्वच विभागांसाठी पत्रक काढले असून, न्यायालयाच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावं असं पत्रकात म्हटलं आहे.
Monday, April 24, 2023
वय झाले पण नोकरी मिळाली नाही तत्काळ अनुकंपा भरती करा. उपजिल्हाधिकाऱ्यांसमोर कैफियत मांडत निवेदन सादर.
बीड (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील अनेक तरुणांची नावे अनुकंपाधारकांच्या यादीत असून, १० ते १२ वर्षांपासून हे तरुण नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. काही जणांचे तर वय झाले आहे. जिल्ह्यातील सर्व विभागांतील रिक्त पदांचा आढावा घेऊन अनुकंपाधारकांना शासकीय सेवेत घ्यावे, अशी मागणी जिल्ह्यातील अनुकंपाधारकांनी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांच्याकडे करीत निवेदन सादर केले.
अनुकंपाधारकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाशिक जिल्ह्यातील अनुकंपा सामाईक प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना फेब्रुवारी २०२३ या महिन्यात सर्व विभागांच्या रिक्त पदांचा आढावा घेतला. त्यानंतर अनुकंपा उमेदवारांना नियुक्ती देण्याचे आदेश नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले. जिल्हाधिकारी सामायिक यादीमधून नाशिकमध्ये १२७ अनुकंपाधारकांची नियुक्ती केली आहे. बीड जिल्हा सामायिक अनुकंपा प्रतीक्षा यादीतील अनुकंपा उमेदवार असून, मागील अनेक वर्षांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत.
रिक्त पदांचा आढावा घ्यावा.
पुणे, कोल्हापूर, नांदेड, परभणी, लातूर, नाशिक व इतर जिल्ह्यांत सामायिक अनुकंपा प्रतीक्षा यादीतून पात्र उमेदवारांना नोकरी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे बीड जिल्ह्यातही सर्व विभागांतील रिक्त पदांचा आढावा घेऊन अनुकंपाधारकांना शासकीय सेवेत घ्यावे, त्यांच्या वयाचा विचार करता एजबार होण्यापूर्वी सेवेत घ्यावे, अशी मागणी जिल्ह्यातील अनुकंपाधारकांनी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांच्याकडे करीत निवेदन सादर केले.
भूसंपादन मावेजा गैरव्यवहार प्रकरणी उपजिल्हाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा. शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन.
बीड (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील लघुपाटबंधारे विभागाचे तत्कालीन उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात भूसंपादन मावेजा वाटपात अनियमितता व आर्थिक गैरव्यवहार झाले आहेत. बनावट दस्तऐवज तयार करून संगनमताने अपहार करून तक्रारी नंतर संचिका गायब करण्यात आल्या आहे. या प्रकरणी तत्कालीन उपजिल्हाधिकारी सुर्यवंशी यांच्यासह अव्वल कारकून श्रीनिवास मुळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी संबंधित शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी आंदोलन केले.
संचिका गहाळ प्रकरणात संबंधित जबाबदार अधिकारी कर्मचाऱ्यांवर न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हे दाखल करण्यात यावेत तसेच चौकशीस जाणिवपूर्वक दिरंगाई केल्याबद्दल चौकशी अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी प्रस्तावीत करून प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात शेख युनुस, शेख मुस्ताक , शेख मुबीन, बलभीम उबाळे, मिलिंद सरपते, बाबासाहेब मेंगडे, गवळण मेंगडे, रावसाहेब मेंगडे, अमोल मेंगडे, भिमराव बांगर, विठ्ठल जाधव, विजय ईगडे आदी सहभागी होते. निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांच्या मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, प्रधान सचिव, जलसंपदा मंत्री, विभागीय आयुक्त यांना निवेदन देण्यात आले.
शासनाची दिशाभूल करत फसवणूक.
पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी येथील गट क्रमांक १०० गाव तलाव क्र.५ मध्ये माझ्या जमिनीवर तलाव बांधण्यात आला आहे. तत्कालीन उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी व अव्वल कारकून श्रीनिवास मुळे यांनी १ कोटी ४६ लाख रुपये बनावट दस्तऐवज तयार करून शासनाची दिशाभूल करत फसवणूक केली. संबंधित प्रकरणात फौजदारी गुन्हे दाखल करून मला मावेजा देण्यात यावा- बाबासाहेब मेंगडे, शेतकरी, मेंगडेवारी, ता. पाटोदा
केज तालुक्यातील कौडगांवात रूजतायेत समताधिष्ठित मुल्यांची पाळेमुळे. सुरुवात होतेय महामानवांची 132 वी सार्वजनिक जन्मोत्सवातुन.
धारूर घाटातून जीव मुठीत घेऊन करावा लागतो प्रवास. गेल्या चार वर्षांपासून घाटाचे रुंदीकरण रखडले. अरुंद रस्त्यामुळे आता पर्यंत ५० बळी.
धारूर (प्रतिनिधी) : शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग ५४८-सी चे काम करताना धुनकवड पाटी ते धारुर घाटासह शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंतच बारा किलोमीटर रस्ता अरुंदच ठेवून फक्त वरवर डागडुजी करण्यात आली. गेल्या चार वर्षांपासून हा रस्ता अरुंदच राहिल्याने धारुर घाटाचे रुंदीकरण रखडल्याने हा अपघात मार्ग झाला आहे. आतापर्यंत ५० जणांचे बळी या रस्त्याने घेतले आहेत. यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
धारुर शहरातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५४८-सी हा खामगाव-पंढरपूर पालखी मार्ग गेल्यावर या परिसरातील या मार्गावरील गावांनी खूप आनंद व्यक्त केला; मात्र या रस्त्याचे काम होताना धुनकवड पाटी ते धारुर शहरातील भारतरत्न डॉ. आंबेडकर चौक हे बारा किलोमीटर रस्त्याचे काम रुंदीकरण न करता आहे त्या रस्त्यावर फक्त डागडुजी करून हे काम आटोपण्यात आले. आरणवाडी साठवण तलावाच्या बाजूने डोंगराचे पायथ्यापासून दोन किलोमीटर रस्ता करण्यात आला. अवघड वळणामुळे हा रस्ता अपघाताला निमंत्रण देणारा रस्ता झाला आहे. धारुर घाटातही तीन किलोमीटरपर्यंत एका बाजूने खोलदरी, अवघड वळणे, खोल दरीच्या बाजूने रोडबरोबर आलेली संरक्षण भिंत यामुळे रस्ता अरुंद बनला आहे. यामुळे या रस्त्यावरून वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. वाहन दरीत कोसळणाऱ्या घटना तर नियमित झाल्या आहेत. घाटात अपघाताचे प्रमाण वाढले असून रोजच लहान, मोठे अपघात होत आहेत. आतापर्यंत पन्नासपेक्षा जास्त बळी या घाटाने व अवघड वळण रस्त्याने घेतले आहेत. घाटात नेहमीच वाहतूकही ठप्प होते. चार वर्षे होऊनही एमएसआरडीसीचे अधिकारी घाट रुंदीकरणाकडे मात्र दुर्लक्ष करीत आहेत.
धारुर घाट रुंदीकरण तत्काळ करा.
या रस्त्याने वाहनाची वर्दळ वाढली आहे. धारुर घाट व साठवण तलावाशेजारचा पर्यायी रस्ता अरुंद असल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. त्यामुळे तत्काळ घाटाचे रुंदीकरण करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बंडोबा सावंत यांनी केली आहे.
परवानगी मिळताच काम करू.
धारुर येथील घाटातील रुंदीकरणासाठीचा प्रस्ताव रस्ते विकास महामंडळास पाठविण्यात आला आहे. परवानगी मिळताच हे काम तत्काळ सुरू करण्यात येईल, असे एमएसआरडीसीचे उपअभियंता अतुल कोटेचा यांनी सांगीतले.
पोलिसांचा देखील पाठपुरावा सुरु.
धारुर घाटात वाहनांची वर्दळ वाढल्याने अपघात होत आहेत. यामुळे वाहनांची कोंडी होत आहे. यामुळे पोलिसांनाही सतत याकडे लक्ष ठेवावे लागते. त्यामुळे तत्काळ रुंदीकरण करण्यासाठी संबंधित खात्याकडे पाठपुरावा सुरू असल्याचे धारुरचे सहायक पोलिस निरीक्षक व्ही. एस. अटोळे यांनी सांगितले.
सावध व्हा ! बाजार समितीला ते गुटखा, जुगार अन् वाळूचा अड्डा बनवतील - याेगेश क्षीरसागर.
जर यांच्या ताब्यात बाजार समिती गेली तर ते हमालांना देखील सोडणार नाहीत. हमालांकडून देखील 50 रुपये का होईना टक्केवारी घेतील असा सणसणीत टाेला योगेश क्षीरसागर यांनी भाऊ संदीप क्षीरसागरांना लगावला आहे.
ते पुढे म्हणाले, की यांच्यासोबत जे आहेत ते जुगार, गुटखा, वाळूच्या धंद्यावाल्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत यांच्या बाहेरच्या गोडाऊनवर कारवाया झाल्या. मात्र यांच्या ताब्यात जर बाजार समिती गेली तर मग बाजार समितीचे एक नंबरचे गोडाऊन गुटख्यासाठी, दोन नंबरचा गोडाऊनमध्ये जुगार अड्डा आणि तीन नंबरच्या गोडाऊनमध्ये वाळूचा स्टॉक असं हे करतील.
त्यामुळे व्यापारी आणि हमाल बांधवांना जगणं मुश्किल होईल असं म्हणत योगेश क्षीरसागर यांनी भाजप, शिंदे गट, ठाकरे गट यांनी एकत्रित मिळून केलेल्या पॅनलवर टीकास्त्र सोडले.
पोलिसांची जुगार अड्डयावर धाड.२ लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त ७ जणांना अटक.
७ जणांना अटक
पोलिसांनी केलेल्या या कारवाईत ७ जुगाऱ्यांना अटक करण्यात आली. यात शेख शकीर शेख दगडू (रा. पिंपळनेर), नितीन चिंतामण खांडे (रा. पिंपळगाव), दिनकर सुदाम माने (रा. पिंपळगाव), दत्तू दुधाची पवार (रा. गंगनाथवाडी), प्रकाश मोतीराम कानडे (रा. रजाकपूर), सय्यद अफसर अब्दुल (रा. माळस जवळा), विठ्ठल साहेबराव कानडे (रा. रजाकपूर) असे पकडण्यात आलेल्या जुगाऱ्यांचे नाव आहे. दरम्यान याप्रकरणी बीडच्या पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सीसीटीएनएसच्या वापरात बीड राज्यात प्रथम. पुणे पोलिस राज्यात तळाला. केवळ ३८ टक्के गुण.
पुणे (प्रतिनिधी): देशभरातील गुन्ह्यांची तसेच गुन्हेगारांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होण्यासाठी उपयुक्त ठरलेल्या ‘क्राईम क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टम’(सीसीटीएनएस) प्रणालीच्या वापरात पुणेपोलिस विभाग अगदीच काठावर पास झाला आहे. शहरातील गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी तसेच अवघड गुन्ह्यांची उकल करण्यासाठी या प्रणालीचा उपयोग होतो. सीसीटीएनएस प्रणालीचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला असून, त्यात पुणे पोलिस राज्यात अगदीच तळाला असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, बीड हे शहर राज्यात प्रथम आले आहे.
देशभरात सीसीटीएनएस ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीचा फेब्रुवारी २०२३ चा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. त्यात पुणे पोलिसांना ३४२ पैकी केवळ १३० (३८ टक्के) असे सर्वात कमी गुण मिळाले आहेत. बीड पोलिसांनी मात्र ३४२ पैकी ३३५ गुण (९८ टक्के) मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. दुसरीकडे पुणे पोलिसांच्या थोडेसे पुढे पुणे ग्रामीण पोलिस असून, त्यांना ३४२ पैकी १४७ गुण (४३ टक्के) मिळाले आहेत.
गेल्या वर्षी राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयाने घेतलेल्या सर्वोत्कृष्ट पोलीस घटक स्पर्धेत पुणे पोलीस दलास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते. उत्कृष्ट कार्यपद्धती, गुन्हेगारी प्रतिबंध, गुन्ह्यांचा त्वरित तपास आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना प्रोत्साहित करण्यासाठीच्या योजना, अशा निकषांमध्ये पुणे पोलिस अव्वल ठरले होते.
काय आहे सीसीटीएनएस प्रणाली?
देशभरातील गुन्ह्यांची तसेच गुन्हेगारांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी, यासाठी ही यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. त्यात प्रथम माहिती अहवाल (एफआयआर), गुन्हेगारांची माहिती ऑनलाइन नोंदविली जाते. या यंत्रणेला सीसीटीएनएस प्रणाली म्हणून ओळखले जाते. या प्रणालीमुळे कोणत्याही पोलिसांना देशभरातील गुन्हेगारांची माहिती उपलब्ध होऊ शकते.
७ प्रकारची माहिती भरणे आवश्यक
सीसीटीएनएस प्रणालीमध्ये ७ प्रकारची माहिती भरणे आवश्यक असते. त्यात प्रथम एफआयआर, गुन्ह्यांचा तपशील, गुन्हेगारांची अटक, मालमत्ता तपासणी, मुद्देमाल जप्त, हत्यार जप्ती, कोर्ट निर्णय याची माहिती या प्रणालीवर नोंदविली गेली पाहिजे. याशिवाय बेपत्ता व्यक्ती, मयत अनोळखी व्यक्तींची नोंद, गुन्हेगारी टोळ्या, त्यांचे सदस्य अशा विविध गुन्हेगारांशी संबंधित माहिती या प्रणालीवर भरणे आवश्यक असते.
पुणे पोलिस आयुक्तालयाच्या ३३ पोलिस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आलेल्या सर्व गुन्ह्यांची नोंद सीसीटीएनएसवर करणे आवश्यक असते. यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यातील ५ ते ६ जणांना याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. अनेकदा बंदोबस्त, शनिवार, रविवार सुट्या यामुळे अनेक पोलिस ठाण्यांमधील गुन्हे तसेच इतर बाबींची सीसीटीएनएसवर नोंद होताना दिसत नाही. त्याचा परिणाम महिन्याच्या प्रगती पुस्तकावर दिसून येतो. सध्याच्या पेंडन्सीमुळे पुणे पोलिसांचा क्रमांक तळाला गेला आहे.
पुणे ग्रामीणही मागेच
पुणे पोलिस आयुक्तालयापाठोपाठ पुणे ग्रामीण पोलिस दलही यामध्ये खूप मागे आहे. विशेष म्हणजे डिसेबर २०२१ मध्ये पुणे पोलिस आयुक्तालयाला ७४ टक्के गुण मिळाले होते. त्याचप्रमाणे पुणे ग्रामीण पोलिस दलाला ८४ टक्के गुण मिळाले होते. त्यानंतर आता पुणे ग्रामीणची ४४ टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे
मलनाथपुर येथे ष.ब्र १०८ नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठकर यांच्या हस्ते महादेव मंदिर भूमिपूजन संपन्न.
Sunday, April 23, 2023
युवा नेते अभिजीत कुडे यांचे कार्य उन्हाळ्याच्या सुट्टीत गावातील मुलांना देत आहेत शिक्षणाचे धडे.
महाराष्ट्राला पुढील 4-5 दिवस ‘यलो’ अलर्ट, ‘या’ भागात गारपीटीचा इशारा.
मुंबई - महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पुढचे चार ते पाच दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला अलर्ट देण्यात आला आहे.
बापरे! कोरोना काळात झाले तब्बल 20 हजार बालविवाह .बीड जिल्ह्यातील धक्कादायक वास्तव समोर.
याबाबत अधिक माहिती अशी की, बीड जिल्ह्यामध्ये वारंवार बालविवाह होत असल्याच्या बातम्या समोर येत असतात. ज्यामुळे चिंता व्यक्त केली जात असतानाच पुन्हा एकदा बालविवाहाचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. सामाजिक कार्यकर्ते तत्वशील कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकट्या बीड जिल्ह्यात जवळपास 20 हजार पेक्षा जास्त बालविवाह झाले आहेत. हे सगळे बालविवाह कोरोना काळात झाल्याचेही समोर आले आहे.
याबद्दल बोलताना तत्वशील कांबळे म्हणाले की, "की बीड जिल्हा प्रामुख्याने ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे. या जिल्ह्यातून ऊसतोडणीसह इतर कामांसाठी जवळपास दहा ते बारा लाख कामगार लोकं स्थलांतरीत होतात. यामुळं आपल्या किशोर वयात आलेल्या मुलींना आपल्या सोबत कसं घेऊन जायचं ? समाजात दररोज एक ना अनेक घटना घडतात, यामुळे आपल्या मुलींची असुरक्षितता मनात ठेवून बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बाल विवाह होत आहेत."
तसेच याबद्दल पुढे बोलताना "जर आज शाळेतील मुलींची संख्या पाहिली, तर अतिशय कमी झालेली आहे. पुर्वी एका शाळेत जवळपास 50 मुली असायच्या. मात्र आता जर पाहिलं तर दहा ते पंधरा मुली एका शाळेत आहेत. त्यामुळे या मुली नेमकं गेल्या कुठं असा प्रश्न देखील, असा प्रश्नदेखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. दरम्यान, बालविवाहाचे हे धक्कादायक वास्तव चिंतादायक असल्याचेही ते यावेळी म्हणाले आहेत.