Thursday, April 30, 2026

संत तुकडोजी महाराजांनी आपल्या कीर्तन व ग्रामगीतेच्या माध्यमातून समाजप्रबोधना चे महान कार्य केले-अभयकुमार ठक्कर

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी येथील उपजिल्हा रुग्णालयात आज संत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी उपजिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष अभयकुमार उर्फ पप्पू अण्णा ठक्कर यांच्या हस्ते संत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरुण गुटे, डॉ.  दिनेश कुरमे  तसेच रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अभयकुमार ठक्कर म्हणाले की, संत तुकडोजी महाराजांनी आपल्या कीर्तन व ग्रामगीतेच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे महान कार्य केले. त्यांनी स्वच्छता, व्यसनमुक्ती, ग्रामविकास आणि राष्ट्रभक्ती यांचे महत्त्व पटवून दिले. आजच्या काळात त्यांच्या विचारांची अधिक गरज असून समाजाने त्यांच्या आदर्शांचे पालन करून एक सुदृढ व सुसंस्कृत समाज निर्माण करावा.
तसेच त्यांनी सांगितले की, संत तुकडोजी महाराजांचे कार्य केवळ अध्यात्मिक नसून सामाजिक परिवर्तन घडविणारे होते. त्यांच्या शिकवणुकीतून प्रेरणा घेऊन समाजहितासाठी कार्य करणे हीच त्यांना खरी अभिवादन ठरेल असे श्री ठक्कर म्हणाले.

परळीत सोमवारी मांस विक्री बंदीचा ऐतिहासिक निर्णय सर्वानुमते ठराव मंजूर भक्तांचा व जन भावनांचा आदर.


परळी वैजनाथ (वार्ताहर)  परळी नगरपरिषदेच्या दि. 30 एप्रिल 2026 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत “प्रत्येक सोमवारी मांस विक्री बंदी” या महत्त्वपूर्ण विषयास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. परळी हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक पवित्र तीर्थक्षेत्र असल्यामुळे नागरिक व भाविकांच्या भावना लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला.
यापूर्वी दि. 20 एप्रिल 2026 रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत हा विषय समाविष्ट करण्यात आला होता. त्यानंतर आजच्या सर्वसाधारण सभेत हा विषय मांडून अंतिम मंजुरी देण्यात आली.
परळी नगरपरिषदेच्या थेट लोकनिर्वाचित नगराध्यक्षा *सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी* यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला असून, त्यांच्या “विकास पर्व 2.0” या संकल्पनेतून जनभावना, धार्मिक संवेदनशीलता आणि स्थानिक गरजा यांचा समतोल साधणारे प्रशासन दिसून आले. शहराच्या सर्वांगीण विकासाबरोबरच परळीच्या पवित्रतेचा सन्मान राखण्याचा त्यांचा दृष्टीकोन या निर्णयातून अधोरेखित झाला आहे.
या निर्णयासाठी मा. पंकजाताई गोपीनाथराव मुंडे (पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री, महाराष्ट्र राज्य) व मा. आमदार धनंजय मुंडे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच उपनगराध्यक्षा *सौ. खैसर राजा खान पठाण*, गटनेते तसेच सर्व नगरसेवक-नगरसेविका यांच्या एकमताने हा ठराव मंजूर करण्यात आला.
या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते *श्री. शिवकुमार केदारी (हिंद नगर, परळी वैजनाथ)* यांनी या निर्णयाचे स्वागत करत सर्व पदाधिकारी व सदस्यांचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच या विषयाला व्यापक प्रसिद्धी देणाऱ्या सर्व पत्रकार, ऑनलाइन न्यूज चॅनल व टीव्ही प्रतिनिधी यांचेही त्यांनी विशेष आभार व्यक्त केले.

मराठा भवन व राजमाता जिजाऊंचे स्मारक याविषयी परळी नगर परिषदेची अनास्था.सकल मराठा समाज आक्रमक ११ मे पासून बेमुदत ठिय्या आंदोलचा ईशारा.


परळी वैजनाथ  : (प्रतिनिधी)  अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले “मराठा भवन” व “बाल शिवबासह राजमाता जिजाऊ माँ साहेबांचा पुतळा” याविषयी तात्काळ निर्णय घ्यावा याकरिता मंगळवार दिनांक ३१ मार्च २०२६ रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने परळी वै. च्या नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली होती. परंतु याविषयी परळी नगर परिषदेची अनास्था दिसून येत आहे. त्यामुळे सोमवार दिनांक ११ मे २०२६ पासून नगर परिषद कार्यालया समोर बेमुद्दत ठिय्या आंदोलन करण्याचा ईशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.
परळी शहरात “मराठा भवन” उभारण्यासाठी जागेच्या संर्भात नगर पालिकेकडे अनेक वर्षापासून
मागणी केली जात होती. दि. ७ मे २०२३ रोजी मराठा समाजाच्या झालेल्या व्यापक बैठकीत तत्कालीन पालकमंत्री तथा सद्याचे परळीचे आ.धनंजयजी मुंडे यांनी मराठा भवन बनवण्यासाठी साठी पंडित दिनदयाल उद्यान,औद्योगिक वसाहत येथील जागा देण्याचे नगर पालिकेस आदेशीत केले होते. तशा स्वरूपाची घोषणाही त्यांच्याकडून करण्यात आली होती. मराठा समाजाकडून या निर्णयाचे मोठ्या प्रमाणात स्वागत पण केल्या गेले होते.
परंतु आजतागायत शिवसृष्टी तथा मराठा भवन जागेच्या बाबतीत होत असलेली थट्टा आता सहन केली जाणार नाही. बहुतेक न. प. प्रशासनास मागणीच्या अनुषंगाने निर्णय घ्यायचाच नाही का काय ? मराठा समाजास असा प्रश्न पडत आहे.
दुसरा विषय असा की परळी शहरातील राजमाता जिजामाता उद्यानाचे काम करण्यासाठी लाखो रुपये खर्च झाले आहेत. सदरील उद्यानाच्या प्रवेशद्वारा समोर बालशिवबा सहित जिजाऊ माँ साहेबांचा पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी समस्त परळीकरांकडून वारंवार करण्यात आली होती. जिजाऊ माँ साहेबांचा पुतळा उभारण्यासाठी तशा स्वरूपाचे बेसमेंट पण करण्यात आले आहे. मात्र नगर पालिकेस मुहूर्त का सापडत नसेल ? परळीकरांना हा प्रश्न पडला आहे.
तब्बल तीन वर्षाची मागणी अद्याप पावेतो पूर्ण केली गेली नाही. ठिय्या आंदोलनाचे निवेदन देऊन एक महिना उलटला परंतु त्याकडे न. प. कार्यालयाकडून पूर्णपणे दुर्लक्ष केल्या गेले. आमच्याकडे आता आंदोलना शिवाय पर्याय उरला नाही. असे सकल मराठा समाजाच्या वतीने आम्ही ठिय्या आंदोलनावर ठाम असल्याचे सांगण्यात आले आहे.

Monday, April 27, 2026

उष्माघाताचा पहिला तीव्र उन्हाने शरीर पोळले, उष्माघाताने तरूणाचा मृत्यू .


परभणी(प्रतिनिधी) जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी नोंदवला गेला आहे. नाशिक येथून परभणीत आपल्या भावाला भेटण्यासाठी आलेल्या 37 वर्षीय शिवाजी बबन कांबळे या व्यक्तीचा तीव्र उन्हामुळे मृत्यू झाला.

ही धक्कादायक घटना परभणीतील नांदखेडा रोड भागात घडली आहे. शिवाजी कांबळे हे मूळचे जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथील रहिवासी असून कामासाठी ते नाशिकला स्थायिक झाले होते. दोन दिवसांपूर्वीच ते आपल्या कुटुंबासह परभणीत विटभट्टीवर काम करणाऱ्या भावाकडे आले होते, मात्र काळाने त्यांच्यावर घाला घात.

साडूच्या घरी जाताना चक्कर आली आणि खड्ड्यात कोसळले

शिवाजी कांबळे हे 24 एप्रिल रोजी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास आपली पत्नी मिनाक्षी, मुलगी विद्या आणि सासू यांच्यासह साडू विजय मस्के यांच्या घरी जाण्यासाठी निघाले होते. वाटेत जात असताना त्यांना अचानक चक्कर आल्याचे त्यांच्या मुलीने पाहिले. त्यानंतर ते बेपत्ता झाले होते. दुपारी 12 वाजेच्या सुमारास त्यांच्या पत्नीने ही माहिती भाऊ महादेव कांबळे यांना दिली. बराच वेळ शोध घेतल्यानंतर, मोबाईल लोकेशनच्या आधारे शोध घेतला असता नांदखेडा रोडवरील एका खड्ड्यात शिवाजी यांचा मृतदेह पालथ्या अवस्थेत पडलेला आढळून आला.

तीव्र उन्हाने शरीर पोळले; पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

शिवाजी यांचा मृतदेह सापडला तेव्हा त्यांचे शरीर कडक झाले होते आणि पाठ व हातावर तीव्र उन्हामुळे त्वचा करपल्याचे व्रण दिसत होते. त्यांच्या नाकातून आणि तोंडातून रक्त येत असल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी पाहिले. विटभट्टी मालक देशमुख यांच्या गाडीतून त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेनंतर महादेव बबन कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नानलपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Saturday, April 25, 2026

टोकवाडी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

*जय हिंद सामाजिक प्रतिष्ठानचा स्तुत्य   उपक्रममाने जयंती साजरी 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जय हिंद सामाजिक प्रतिष्ठानचा सामाजिक उपक्रमाने साजरी करण्यात आली यावेळी 
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती टोकवाडी येथे मोठ्या उत्साहात  साजरी करण्यात आली.
यावेळी गावात मिरवणुक दरम्यान उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन जय हिंद सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने मोफत  पाण्याच्या बॉटल चे वाटप करण्यात आले यावेळी टोकवाडी चे माजी सरपंच मारोतरावजी मुंडे गुरुजी, नाथराव दादा मुंडे,  संभाजी मुंडे योग प्रशिक्षक,विवेकानंद हॉस्पिटलचे संचालक डॉ. भरत मुंडे साहेब ,भाजपा तालुका उपाध्यक्ष संजय मुंडे सर, युवा नेते तुकाराम टी.डी.मुंडे, टोकवाडी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच बंडूभाऊ काळे डॉ. संदीपान काळे, सोपान तात्या मुंडे, श्रीराम मुंडे,ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य तुकाराम भक्तराम मुंडे, युवा उद्योजक अर्जुन मुंडे,ज्येष्ठ नेते महादेव आण्णा मुंडे , श्रीनिवास मुंडे,प्रदीप घुले, माउली फड, राजाभाऊ गित्ते,गणेश नागरगोजे,दिलीप भालेराव,भरत रोडे , पंडितराव रोडे,अमर रोडे , साहेबराव रोडे, माजी उपसरपंच सुरेश रोडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.*

केजमध्ये गरिबांचा घरकुल निधी गायब ४ कोटींचा घोटाळा; निवृत्त मुख्याधिकाऱ्या सह ६ जणांवर गुन्हा.

असा झाला ४ कोटींचा 'डबल गेम

'२० मे २०२१ ते ३१ जानेवारी २०२२ या कालावधीत तत्कालीन मुख्याधिकारी मिलिंद सावंत यांनी लेखापाल आणि इतर कर्मचाऱ्यांच्या संगनमताने हा निधी नियबाह्य पद्धतीने वापरला. केंद्र आणि राज्य सरकारकडून प्राप्त झालेला निधी केवळ पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करणे बंधनकारक असताना, तो इतर अनधिकृत खात्यांवर वळवण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या उपविभागीय अधिकारी दीपक वजाळे यांच्या समितीने सखोल चौकशी केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

गुन्हा दाखल झालेले आरोपी.

मुख्याधिकारी अजित ढोपे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी खालील सहा जणांवर गुन्हा नोंदवला आहे:१. मिलिंद सावंत (तत्कालीन मुख्याधिकारी, सेवानिवृत्त)२. असद इसाकोद्दीन खतीब (तत्कालीन लेखापाल)३. लक्ष्मण मारुती जगताप (कंत्राटी लेखापाल सहाय्यक)४. भास्कर एकनाथ ससाणे (व्हॅल्वमन)५. भीमराव शामराव मस्के६. बाशेद वलियोद्दीन काझी

कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेनंतर ऊसतोड मजूर महिलांवर जमिनीवरच उपचार कामा ला जायचे असल्यान रुग्णाचा आग्रह !


केज (प्रतिनिधी):बीड जिल्ह्याचा कणा असलेल्या ऊसतोड मजुरांच्या नशिबी असलेली परवड काही केल्या संपण्याचे नाव घेत नाही. कष्टाचे डोंगर उपसून ऊसतोडीचा हंगाम संपवून परतलेल्या महिला मजुरांना आता सरकारी दवाखान्यातही अपमानास्पद वागणूक मिळत आहे. केज तालुक्यातील विडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेनंतर पाच महिलांना चक्क जमिनीवर झोपवून उपचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेने आरोग्य विभागाचे ढिसाळ नियोजन चव्हाट्यावर आले आहे.

बेड १० आणि रुग्ण १५; नियोजन शून्य !
२२ एप्रिल रोजी विडा आरोग्य केंद्रात कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण १५ महिलांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मात्र, आरोग्य केंद्रात केवळ १० बेड उपलब्ध होते. उर्वरित पाच महिलांना शस्त्रक्रियेसारखी गंभीर प्रक्रिया पार पडल्यानंतर चक्क जमिनीवर झोपवण्यात आले. संसर्गाचा मोठा धोका असतानाही, या महिलांना अशा असुरक्षित स्थितीत ठेवणे म्हणजे त्यांच्या जिवाशी खेळण्याचाच प्रकार आहे.

प्रशासनाकडून अजब 'सारवासारव'.

या प्रकरणाची माहिती पसरल्यानंतर प्रशासनाने अजब तर्क मांडण्यास सुरुवात केली आहे. "त्या महिलांनीच आम्हाला जमिनीवर उपचार चालतील, असे सांगितले होते," असा दावा वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहन गायकवाड यांनी केला आहे. मात्र, रुग्ण असुविधा असतानाही उपचार करा म्हणत असेल, तर डॉक्टर आपली जबाबदारी झटकून रुग्णाला धोकादायक स्थितीत ठेवू शकतात का? हा खरा प्रश्न आहे.

आरोग्य मंत्र्यांकडूनही विचारणा.

या प्रकाराची आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनीही दखल घेतली. त्यांनी थेट महिला रुग्णांशी संवाद साधला. मात्र, त्याआधीच या महिलांना प्रशासनाकडून "काय बोलावे" याचे प्रशिक्षण दिल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे मंत्र्यांकडे तक्रार झाली नसल्याची चर्चा आहे. आता आबिटकर कारवाई करणार की, डॉक्टरांच्या खुलाशावर समाधान मानून त्यांना पाठीशी घालणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

महिलांनीच आग्रह धरला.

१५ पैकी ५ महिलांना गादी टाकून उपचार केले. संसर्ग होणार नाही, याची काळजी घेतली. महिलांनीच कामाला जायचे असल्याने आग्रह धरला होता. आरोग्य मंत्री यांनीही फोनवरून महिला रुग्णांशी संवाद साधला आहे.-डॉ. रोहन गायकवाड, वैद्यकीय अधिकारी, विडा ता. केज.