मुंबई (प्रतिनिधी) राज्यात एका बाजूला शेकडो शाळा अत्यल्प पटसंख्या असूनही सुरू आहेत, तर त्याच वेळी अत्यल्प पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये शिक्षकसंख्या मोठी आहे. परिणामी, कमी पट असलेल्या शाळांचे अस्तित्व आणि शिक्षकांच्या नोकऱ्या या दोन्ही गोष्टी धोक्यात आल्या आहेत. ‘कमी विद्यार्थी आणि अधिक शिक्षक’ अशा विसंगत परिस्थितीमुळे अनुदानित तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांतील शाळांतील 30 हजारांवर शिक्षकांना अतिरिक्त होण्याची भीती आहे.
राज्यात एकूण 1 लाख 8 हजार 35 शाळांमध्ये तब्बल 7 लाख 46 हजार 377 शिक्षक कार्यरत आहेत आणि तब्बल 2 कोटींहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ही आकडेवारी समाधानकारक वाटत असली, तरी प्रत्यक्षात चित्र वेगळे आहे.
अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या अत्यल्प असताना शिक्षकांची संख्या अधिक असल्याचे कारण देत शालेय शिक्षण विभागाकडून 15 मार्च 2024 च्या शासन निर्णयानुसार 20पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या शाळांतील शिक्षकांना अतिरिक्त ठरवले जात आहे. अतिरिक्त व समायोजन झालेल्या शिक्षकांचे वेतन रोखण्याचेही प्रकार आता शालेय शिक्षण विभागाकडून सुरू झाले आहेत. सध्या सुरू असलेली ‘पटपडताळणी’ मोहीम 22 एप्रिलपर्यंत चालणार आहे.
या ‘पटपडताळणी’नंतर मोठ्या प्रमाणावर शिक्षक समायोजन होण्याची शक्यता असून, कमी पट असलेल्या शाळांतील तब्बल 80 हजार शिक्षकांचे समायोजन होईल, अशी भीती आहे. विशेषतः ग्रामीण भागातील शाळा, जिथे आधीच विद्यार्थीसंख्या घटली आहे, त्या शाळांवर याचा मोठा परिणाम होईल. अशा शाळा बंद होण्याची किंवा त्यांची समूह शाळा होण्याची शक्यता अधिक आहे.
" कुटुंब नियोजनामुळे कुटुंबात एक किंवा दोन शिकणारी मुले आहेत. ग्रामीण भागात शिकलेले पालक शहराकडे स्थलांतरित झाले किंवा त्यांची मुले शहरांत शिकत आहेत. यातून ग्रामीण शाळांतील विद्यार्थी संख्या कमी होत चालली आहे. पटसंख्या राखण्यात येणाऱ्या अडचणी समजून घेणे महत्त्वाचे आहे.-महेंद्र गणपुले, माजी उपाध्यक्ष मुख्याध्यापक संघटना
" पहिली ते पाचवीचे वर्ग असताना दोन शिक्षक असण्यात चुकीचे काय? कमी पटसंख्येच्या शाळेत दोन शिक्षक आहेत म्हणजे खूपच शिक्षक आहेत ही भूमिकाच चुकीची आहे.सहावी ते आठवीची पटसंख्या 20 पर्यंत असल्यास नवीन संचमान्यता धोरणानुसार गणित-विज्ञान विषय पदवीधर शिक्षकाचे एकच पद, उर्वरित तीनही भाषा आणि समाजशास्त्र याकरिता एकच शिक्षक हे कसे? सर्वच विषय एकाच शिक्षकाने शिकविण्यातून गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडवणे शक्य तरी आहे का?-विजय कोंबे, राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती
No comments:
Post a Comment