Tuesday, January 13, 2026

तीन पोरीच,पण पोराचा हट्ट. संसारच्या छळाला कंटाळून विवाहितेचीे आत्महत्या.

बीड (प्रतिनिधी) : पुरोमागी महाराष्ट्राला लाजवेल अशी घटना बीडमधून समोर आली आहे. 'तुला तिन्ही मुलीच झाल्या, आमच्या वंशाला दिवा नाही' असा टोमणा मारत सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या अमानुष शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून एका २५ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उंदरी (ता. केज) येथे घडली आहे. अरुणा उद्धव ठोंबरे असं मृत महिलेचं नाव असून, याप्रकरणी पती, सासू आणि सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दारू पिऊन मारहाण

आजरखेडा येथील प्रकाश सूर्यवंशी यांची मुलगी अरुणा हिचा विवाह १६ ऑगस्ट २०१९ रोजी उंदरी येथील उद्धव ठोंबरे याच्याशी झाला होता. लग्नानंतर अरुणा यांनी राजनंदिनी आणि आर्या आणि अपूर्वा या जुळ्या मुलींना जन्म दिला. मात्र, तिन्ही मुलीच झाल्याने पती उद्धव याने दारू पिऊन मारहाण करण्यास सुरुवात केली. यात सासू इंदूबाई आणि सासरे उत्तम ठोंबरे यांनीही टोमणे मारत छळात भर टाकली.

१० जानेवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास...

सासरच्या जाचाला कंटाळून अरुणा यांनी अनेकदा माहेरी राहण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, 'संसार नीट होईल' या आशेवर माहेरच्यांनी त्यांची समजूत काढून पुन्हा सासरी पाठवले. अखेर हा जाच असह्य झाल्याने १० जानेवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास अरुणा यांनी राहत्या घरी फॅनला साडीने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. आईच्या या टोकाच्या पावलामुळे ५ वर्षांची राजनंदिनी आणि ४ वर्षांच्या आर्या व अपूर्वा या तीन निरागस मुलींचे मातृछत्र हरपले आहे. ज्या मुलींच्या जन्मावरून आईला छळ सोसावा लागला, त्याच मुली पोरक्या झाल्याने उंदरी परिसरातून तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment