बीड (प्रतिनिधी) राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात खरिपात बोगस पिक विमा काढल्याचे धक्कादायक प्रकरण ताजे असतानाच पुन्हा एकदा रब्बीतही बोगस पिक विमा भरल्याचं धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पेरणी व पीक विमा आकडेवारी त लाखाे हेक्टरची तफावत आढळून येत असल्याने हा संशयित घाेटाळा समाेर आला आहे.
रब्बीचा पेरा हा सव्वातीन लाख हेक्टरवर असताना आतापर्यंत जवळपास 5 लाख हेक्टर वरील पिक विमा काढण्यात आला आहे. तर अद्यापही पीक विमा भरणे सुरूच असल्याने हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. यामुळे पुन्हा एकदा बीड जिल्ह्यातील बोगस पीक विम्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
विशेष म्हणजे खरिपात ज्यांनी बोगस पिक विमा भरला त्यांच्यावर ठोस आणि कडक कारवाई न झाल्याने पुन्हा एकदा बोगस पिक विमा भरला जात असल्याची चर्चा सुरू आहे.
खरीप हंगाम- 2023 मध्ये शासकीय जमीन शेत दाखवून काही लोकांनी बोगस पीक विमा भरला होता. असे असतानाही पुन्हा रब्बी हंगामात अतिरिक्त पीक विमा भरल्याचा प्रकार समोर आला आहे.
बीड जिल्ह्याचे रब्बी हंगामातील पीक पेरणी क्षेत्र 3 लाख 32 हजार 353 हेक्टर आहे. परंतु आतापर्यंत 5 लाख 74 हजार 39 हेक्टरचा पीक विमा शेतकऱ्यांनी भरला आहे. अतिरिक्त पीक विमा भरला गेला असल्याने पुन्हा बोगस विमा भरल्याचा संशय निर्माण झाला आहे.
हरभऱ्यात अधिक भरला विमा
कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यात हरभऱ्याचे एकूण क्षेत्र 1 लाख 16 हजार 320 हेक्टर आहे.तर आतापर्यंत 1 लाख 28 हजार 381 हेक्टरवर पेरणी झाली आहे. म्हणजेच 110 टक्के पेरणी झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला पीक विमा कंपनीकडे 5 लाख 66 हजार 652 शेतकऱ्यांनी 2 लाख 86 हजार 432 हेक्टरवर हरभऱ्याचा पीक विमा काढला आहे. पेरणी व पीक विमा आकडेवारीत 1 लाख 70 हजार 112 हेक्टरची तफावत आढळून येत आहे.
दरम्यान यामुळे पुन्हा एकदा बीड जिल्ह्यात खरीपानंतर रब्बीच्या पीक विमा भरण्यातही घोटाळा झाल्याच स्पष्ट होत आहे.त्यामुळे आता कोणत्या गावात किती अतिरिक्त पिक विमा भरला गेलाय ? हे पिक विमा भरण्याची तारीख संपल्यानंतर स्पष्ट होणार आहे.
No comments:
Post a Comment