किल्लेधारूर (प्रतिनिधी) : शहरात काही निवडक भागातील पंधरा-सोळा वयाच्या मुलांना सुलोचन व इतर नशा करण्याचे व्यसन जडत असल्याचे समोर येत आहे. मोलमजुरी करणाऱ्या गरीब कुटुंबातील या मुलांकडे आई-बाबांचे दुर्लक्ष होऊन ते नशेच्या आहारी गेल्याचे दिसून येत आहे. वेळीच या मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे.
शहरातील विविध भागांतील सुलोचन आणि अन्य अमली पदार्थांची नशा करणारे अल्पवयीन मुले मोठ्या प्रमाणात फिरताना दिसून येत आहेत. हात रुमाल अथवा जुन्या कपड्यावर सुलोचन टाकून ही मुले नशा करताना दिसून येत आहेत. या मुलांच्या आई-वडिलांच्या दुर्लक्षामुळे तसेच मित्र परिवाराच्या संगतीमुळे ही मुले नशेच्या आहारी जात आहेत. सुलोचनची नशा करणाऱ्या मुलांचा आहार कमी होतो.
तसेच नशा केल्यास कसल्याही प्रकारची मानसिकता राहत नाही. शिवाय त्यांच्या प्रकृतीवर देखील विपरीत परिणाम होत आहेत. पंचरचे सुलोचन कुठल्या ही जनरल स्टेशनरीच्या दुकानात सहजतेने उपलब्ध होत असल्याने त्याचा गैरफायदा ही मुले घेत असल्याचे दिसत असून, या होणाऱ्या गैर प्रकाराकडे लक्ष देण्याची गरज आहे. दिवसेंदिवस मुलांना नशा करण्याची सवय लागत असून, याकडे युवक वळत आहे. कमी पैशात नशा होत असल्याने नशेकडे युवक लवकर वळत असल्याचे दिसत आहे.
सध्या शहरातील काही भागात नशा करणाऱ्या युवकांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. हेच युवक भविष्यात गुन्हेगारी वृत्तिकडे वळून भविष्य अंधकारात ढकलतात. यामुळे यांच्या आई- वडिलांनी वेळीच मुलांना पायबंद करणे गरजेचे आहे.
-ॲड. व्ही. ए. निंगुळे, ज्येष्ठ विधीज्ञ
मागील काही दिवसांपासून नशेखोरांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे ऐकत आहोत. नशा करणाऱ्या युवकांना भविष्यात मोठी शारीरिक हानी सहन करावी लागणार आहे. दुष्परिणाम अति रागवटपणा, झोप न येणे, बेचैनी, सहन न होणे अशा प्रकारचे दुष्परिणाम असून, पाच ते सात वर्षांनी समरणशक्तीवर देखील परिणाम होऊ शकतो.हे अतिशय हानिकारक असून, वेळीच आई वडिलांनी आपल्या मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे.
-डॉ. मुजाहिद मोमीन, मानसोपचार तज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय, बीड
No comments:
Post a Comment