(कांतीकारी साथी रिपोर्ट) समृद्धी महामार्ग सुरु झाल्यापासून शेकडो अपघात या मार्गावर झाले आहे. अनेक नागरिकांचा याठिकाणी मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुविधेसाठी बांधलेला महामार्ग मृत्यूचा सापळा ठरत आहे.
शुक्रवारी समृद्धी महामार्गावर बुलडाणा येथे बसला भीषण अपघात झाला. त्यानंतर बसने पेट घेतल्याने 26 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघातानंतर समृद्धी महामार्गावरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांचं नेमकं कारण काय? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
हायवे हिप्नोसिस म्हणजे काय?
नागपूरच्या व्हीएनआईटी संस्थेच्या चार विद्यार्थ्यांनी तीन महिने समृद्धी महामार्गावरील अपघाताच्या कारणांचा अभ्यास केला. त्यात सर्वाधिक अपघात 'महामार्ग संमोहन' म्हणजेच हायवे हिप्नोसिसमुळे झाल्याचे निदर्शनास आले आहे. यात चालकाला डुलकी लागणे, अतिवेगामुळे चालकाचे नियंत्रण सुटणे, अतिरिक्त भार असलेले वाहन चालवणे, ताण, रस्ता संमोहन, लक्ष विचलित होणे आदी कारणांमुळे अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.
चालकाने न थांबता सतत गाडी चालवल्यास हायवे संमोहनाचा अनुभव येतो. रिकाम्या महामार्गांवर सतत तेच तेच दृष्य दिसल्याने चालकाला तंद्री लागते आणि त्याला ते कळतही नाही. यामध्ये डोळे उघडे असतात, मात्र मेंदूची क्रिया बंद होते. अनेकदा चालकांना गाडी वेळेत पोहोचवण्याची घाई असते. त्यामुळे काही गोष्टी लक्षात आलेल्या असतानाही ते प्रवाशांचा जीव धोक्यात घाततात.
धोका कसा टाळावा
रोड हिप्नोसिसमुळे अपघात टाळण्यासाठी वाहन चालकांनी अपघात टाळण्यासाठी तासाभरानंतर एखाद्या पेट्रोल पंपावर थांबावं. चहा किंवा कॉफीसारखे पेय प्यायल्याने सुस्ती दूर होईल. गाडी थांबवल्यानंतर खाली उतरुन चालावं. डोळ्यावर पाणी मारुन डोळ्यावरील ताण कमी करावा. तसेच रात्रीच्या प्रवासाआधी निघताना चालकाने चांगली झोप घेणे गरजेचं आहे. गाडीत म्युझिक सुरु ठेवा.
No comments:
Post a Comment