Tuesday, February 6, 2024

पाण्यासाठी दिंद्रुडचे ग्रामस्थ आक्रमक. दोन तास रास्ता रोको करून दखल न घेतल्याने आक्रमक आंदोलकांनी कार्यालयास ठोकले कुलूप.



माजलगाव (प्रतिनिधी): तालुक्यातील दिंद्रुड येथील ग्रामस्थांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहेत. पाण्यासाठी ग्रामस्थांनी दिंद्रुड येथे राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी २ तास रास्तारोको आंदोलन केले. परंतु, याची दखल न घेतल्याने संतप्त आंदोलकांनी माजलगाव गाठून पंचायत समिती कार्यालयास कुलूप ठोकत अधिकारी- कर्मचाऱ्यांना आत कोंडले. 

दिंद्रुड येथे जलजीवन योजनेचे काम अनेक दिवसांपासून रखडले आहे.विहिरी आटत चालल्या आहेत, बोरला पाणी येत नाही. त्यामुळे येथील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याविना मोठे हाल होत आहेत. याबाबत नागरिकांनी अनेक प्रशासकीय ठिकाणी निवेदने दिली होती. परंतु याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे आज सकाळी गावकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गावर दोन तास रिकाम्या हंड्यासह ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनाची प्रशासनाने दखल घेतली नाही.त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आपला मोर्चा माजलगाव पंचायत समिती येथे हलवला. येथे घोषणाबाजी करत पंचायत समिती कार्यालयाच्या मुख्यद्वारास आंदोलकांनी कुलूप ठोकत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना आत कोंडून ठेवले.

No comments:

Post a Comment