Wednesday, November 30, 2022

नवाब मलिकांची तुरूंगातून सुटका होणार? जामीनावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी.

मुंबई ( प्रतिनिधी)  आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आज (बुधवार) मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे नवाब मलिक यांना आज बेल मिळणार की पुन्हा त्यांची रवानगी जेलमध्ये होणार याकडेच सर्वांचं लक्ष लागून आहे. मलिक सध्या कुर्ला येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना, नवाब मलिक हे सरकारमधील मंत्री होते. त्यावेळी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी कनेक्शन असल्याच्या आरोपावरून ईडीने त्यांना 23 फेब्रुवारीला अटक केली होती. याशिवाय गोवावाला कंपाऊंडमधील जमीन खरेदीच्या व्यवहारात नवाब मलिक यांनी आर्थिक गैरव्यवहार केला, असा आरोपही ईडीकडून करण्यात आला. 

यापूर्वी नवाब मलिक यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला होता. त्यामुळे त्यांना दिलासा मिळणार की त्यांच्या अडचणी अजून वाढणार हे पाहावे लागणार आहे. सुमारे पाच महिने उलटूनही तपास यंत्रणेकडून सबळ पुरावे दाखल करण्यात आले नसल्याचा दावा मलिक यांच्या वकिलांकडून करण्यात आला आहे. मात्र त्यांना अद्याप याप्रकरणात दिलासा मिळाला नाही.

दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे ईडीच्या कचाट्यातून सुटले असून अनिल देशमुखांना देखील ईडीचा जामीन मिळाला आहे. आता मलिकांना देखील आज सकाळी 11 वाजता मुंबई सत्र न्यायालयात त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होईल. आता नवाब मलिक यांना दिलासा मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

No comments:

Post a Comment