Tuesday, November 22, 2022

शेतकऱ्याने घरासमोर ठेवलेल्या सोयाबीनच्या पोत्यावर चोरट्यांचा डल्ला.तब्बल 27 पोते लंपास.पोलीस प्रशासन गाफील.

बीड (कांतीकारी साथी न्युज) अतिवृष्टी आणि सुलतानी संकटानंतर आता, बीड  जिल्ह्यातील शेतकऱ्यांपुढे नवसंकट उभा ठाकले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या  शेतीमालावर आता चोरट्यांची नजर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी गेवराई शहरातून कापसाची चोरी झाली होती. ही घटना ताजी असतानाच आता बीडच्या दासखेड गावातून, शेतकऱ्याने घरासमोर ठेवलेले सोयाबीनचे तब्बल 27 पोते अज्ञात चोरट्यांनी लंपास केले आहेत. युवराज कोकाटे असं नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे.

बीडच्या पाटोदा तालुक्यात असणाऱ्या दासखेड येथील शेतकरी, युवराज कोकाटे यांना यंदा सोयाबीनचे 77 पोते झाले होते. हे सर्व पोते त्यांनी आपल्या घराच्या दारात रचून ठेवले होते. दोन दिवसापूर्वी ते कुटुंबासह घरात झोपले असताना, त्यांना मध्यरात्री दीडच्या दरम्यान कुत्रे भुंकल्याचा आवाज आला.

यामुळे त्यांनी दाराची कडी उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र बाहेरून कडी लावल्याने दार उघडता आलं नाही. त्यामुळं त्यांनी बाजूला राहणाऱ्या भावाला फोन केला असता, त्यांच्याही घराची कडी लावल्याचं निदर्शनास आलं. यामुळे त्यांनी पाठीमागील दरवाजातून बाहेर येऊन युवराज कोकाटे यांच्या घराची कडी उघडली आणि यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आल्याने शेतकरी युवराज कोकाटे यांना धक्का बसला.

याप्रकरणी युवराज कोकाटे यांच्या फिर्यादीवरून पाटोदा पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झालाय. दरम्यान जिल्ह्यातील अनेक भागात चोरट्यांकडून शेतमालावर डल्ला मारला जातोय. मात्र पोलीस प्रशासन गाफील असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात असून या घटना तात्काळ रोखाव्यात अशी मागणी केली जात आहे.

No comments:

Post a Comment