Tuesday, February 8, 2022

अमन पार्कचे नागरिक तुंबलेल्या गलिच्छ पाण्याच्या डबक्याने त्रस्त डास व डुकरांच्या त्रासामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात न.प.प्रशासनाचे दुर्लक्ष.

बीड (प्रतिनिधी) - शहरातील आदित्य रेसिडेन्सी व आमराई च्या मध्यभागी असलेल्या अमन पार्क येथे मोठमोठ्या वसाहतींच्या सांडपाण्याचे दोन मोठमोठे डबके तयार झाल्याने त्यात निर्माण होणाऱ्या डासांसह डुकरे व इतर जनावरे येऊन लोळत असल्याने येथील रहिवाशांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. मात्र याकडे या प्रभागातील नगरसेवकांसह बीड नगरपरिषदेचे दुर्लक्ष असल्याने नागरिक हैराण झाले असून जर या भागातील रस्ते व नाल्या बनवून येथील डबक्यांपासून सुटका केली नाही तर  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असे येथील नागरिकांनी म्हटले असल्याचे मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील आदित्य नगरी वेशीच्या अलीकडे असलेल्या आदित्य रेसिडेन्सी च्या बाजूला अमन पार्क ही वसाहत आहे. या वसाहती समोर बाजूच्या वसाहतीचे सर्व सांडपाणी आणून सोडले असल्याने येथे घाण व गलिच्छ पाण्याचे मोठे तळे निर्माण झाले आहे. यामुळे येथे सांड पाण्याचा उग्रवास त्यात डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होत असल्याने या वसाहतीत राहणाऱ्या नागरिकांना श्वास घेणे अवघड झाले आहे. तसेच डासांच्या सुळसुळाटामुळे डास प्रतिबंधक उपाय केल्याशिवाय घरात नागरिक झोपू शकत नाही. अशी अवस्था झाली आहे. शिवाय मोठ्या प्रमाणात पाणी तुंबून असल्याने डुकरांसह म्हशी व घोडे सुद्धा मोठ्या प्रमाणात येत असल्याने त्यांच्यापासून वसाहतीतल्या लहान मुलांना धोका निर्माण झाला आहे. मात्र याकडे या प्रभागातील नगरसेवकांचे साफ दुर्लक्ष असल्याने या दोन्ही डबक्यांविषयी ते कोणतेही कार्य करत नसल्याची तक्रार येथील नागरिकांनी केली आहे. नागरिकांची तक्रार दूर करण्याकरिता व जगणे सुसह्य करण्याकरिता येथील जवळपासच्या सर्व वसाहतींच्या सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याकरीता रस्ते व नाल्या बनविणे आवश्यक आहे. मात्र या बाबीकडे नगरपरिषदेचे  दुर्लक्ष आहे. जर येथील डबक्यातील सांडपाण्याची विल्हेवाट बीड नगर परिषदेने लवकरात लवकर लावली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तक्रारी आंदोलन करण्यात येईल. असेही येथील नागरिकांनी म्हटले असल्याचे मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.

चौकट - 
*नागरिकांचे मनोगत त्यांच्याच शब्दात*
वार्ड क्रमांक ११
जो प्रभाग आमदार साहेबांच्या विजयाची नांदी ठरलेला आहे. जेथून बीड मधील जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि नंतर आमदार बनवून महाराष्ट्राच्या विधान भवनात पाठवले.
त्याच प्रभागामधील नागरिक किती त्रस्त आहेत तेथे साध्या नाल्याची व्यवस्था नसून घरा समोरच जमलेल्या डबक्यात मोकाट कुत्री, डुकरे व इतर प्राण्यांचा सुळसुळाट होऊन त्या दुर्गंधी युक्त दूषित पाण्याने येथील नागरिकांचे आयुष्य धोक्यात आले आहे. संबंधित नगरसेवकाला वारंवार घटनास्थळी नेऊन दाखवून, वारंवार पाठपुरावा करूनही येथील नागरिकांना निराश व्हावे लागत आहे. येथील नागरिक सदर समस्या सोडवण्यासाठी आमदार महोदय व सर्व सबंधित यांना विनंती करत आहेत.

चौकट -
*प्रशासकांनी लक्ष घालावे !*
सध्या बीड नगर परिषदेत नगरसेवक आणि नगराध्यक्षांची मुदत संपल्याने प्रशासकाच्या खांद्यावर बीड नगर परिषदेची जबाबदारी आहे. त्यांनी तरी लक्ष घालून येथे येऊन पाहणी करावी आणि येणाऱ्या बीड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी गलिच्छ  पाण्याच्या या दोन्ही डबक्यांच्या त्रासातून अमन पार्कच्या रहिवाशांना मुक्त करण्याकरिता येथे पक्के रस्ते व नाल्या बनवून द्याव्यात. अशी मागणीही येथील नागरिकांनी केली आहे.

No comments:

Post a Comment