* संपूर्ण देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातल्यामुळे केंद्र सरकार लवकरच देशव्यापी लॉकडाऊन करणार असल्याची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे.
नवी दिल्ली: संपूर्ण देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातल्यामुळे केंद्र सरकार लवकरच देशव्यापी लॉकडाऊन (National Lockdown) करणार असल्याची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे. एका इंग्रजी वृत्त संकेतस्थळाच्या हवाल्याने ही माहिती दिली जात आहे. त्यामुळे एकच मोठी खळबळ उडाली होती.
मात्र, प्रेस इन्फोर्मेशन ब्युरोने (PIB) या वृत्तामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. केंद्र सरकार सध्या देशात लॉकडाऊन लावण्याचा कोणताही विचार करत नाही. हा दावा पूर्णपणे खोटा आहे, असे PIB ने म्हटले आहे.
देशव्यापी लॉकडाऊन करण्याचा निर्णय केंद्र सरकार घाईघाईने घेणार नाही, अशी स्पष्टोक्ती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली. तुर्तास घाईघाईने लॉकडाऊन करावे, अशी परिस्थिती नाही. कोरोना संसर्गाचा वेग प्रचंड आहे, पण या विषाणूवर आपण नक्की विजय मिळवू, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला.
गेल्यावर्षी लॉकडाऊन लावला तेव्हा उद्देश वेगळा होता. त्यावेळी आमच्याकडे कोणतेही औषध किंवा लस नव्हती. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. केंद्र सरकार तत्पर नाही, असे नव्हे.आम्ही सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत आहोत, दोन बैठकाही झाल्या आहेत. त्यावेळी मीदेखील हजर होता. सर्वांच्या सहमतीने जे ठरेल त्याला अनुसरूनच आम्ही पुढे जाणार आहोत. परंतु, घाईगडबडीने देशभर लॉकडाऊन लागू करावे, अशी परिस्थिती सध्या दिसत नाही, असे शाह यांनी म्हटले.
लसीकरणासंदर्भात वैज्ञानिकांशीही चर्चा सुरू आहे. करोनाशी लढण्याची पूर्ण तयारी केली जात आहे. कोरोना संक्रमण प्रसाराचा वेग प्रचंड असल्यानं लढा देणं थोडं कठीण आहे. पण, मला विश्वास आहे की, आपण त्यावर विजय मिळवू.
आपल्या लसीकरण कार्यक्रमाचा वेग जगात सर्वाधिक आहे. पहिल्या दहा दिवसांत भारतात उच्चांकी लोकांचं लसीकरण केलं गेलं. पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोसमध्ये काही दिवसांचं अंतर असलं पाहिजे. त्यामुळे दुसरा डोस देण्याचा कार्यक्रमाला वेगवान केलं जाऊ शकत नाही. लसीकरणाचा तुटवडा निर्माण झाल्याच्या वृत्ताशी मी सहमत नाही, असेही अमित शाह यांनी स्पष्ट केले.

No comments:
Post a Comment