Friday, May 12, 2023

जालना महापालिका होण्याच्या निर्णयानं उद्योगाला येणार अच्छे दिन, पाहा काय होणार फायदा?


जालना(प्रतिनिधी) जालना नगरपालिकेचे रुपांतर आता महापालिकेत होणार असून तशी घोषणा करण्यात आली आहे. यामुळे सामान्य जालनाकरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. याबरोबरच रिअल इस्टेट उद्योग देखील या घडामोडींकडे बारकाईने लक्ष ठेवून आहे. शहर महानगरपालिका होत असल्याच्या निर्णयाच्या या क्षेत्रातील तज्ज्ञांनी स्वागत केले आहे. यामुळे शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणावर होऊन विकास होईल अशी रिअल इस्टेट क्षेत्रातील लोकांची अपेक्षा आहे.

जालना शहर आता महानगरपालिका होणार असून तशी घोषणा करण्यात आली आहे. यावर हरकतीची प्रक्रियाही सुरू झाली आहे. शहराच्या मंठा अंबड, छत्रपती संभाजीनगर, भोकरदन, सिंदखेड या चौफुल्यांकडून जाणाऱ्या महामार्गावर सहा ते आठ किलोमीटरपर्यंत प्लॉटिंग, रोहाऊस, फ्लॅट होण्यासाठी नवीन लेआऊट पडत आहेत. महानगरपालिका होत असल्यामुळे बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांच्या अपेक्षा आता चांगल्याच उंचावल्या आहेत. जालना शहराचा दिवसेंदिवस विस्तार वाढत चालला आहे. अंबड, मंठा, छत्रपती संभाजीनगर, भोकरदन, सिंदखेड राजा रोड या मार्गांनी मोठ्या प्रमाणात शहराचा विस्तार वाढत आहे. अंबड रोडकडे तसेच राजपूतवाडी, सामनगाव रोडकडेही आता मोठा विस्तार होत आहे.

जालना शहर महानगरपालिका होत असल्यामुळे येणाऱ्या काही महिन्यांमध्ये या रोडचेही काम प्रशासनाला तत्काळ हाताळावे लागणार आहे. आता जालना महापालिका होणार असल्यामुळे विशेष करून बांधकाम क्षेत्रात चांगली वाढ होणार आहे. अंबड रोडवरील लक्ष्मीकांतनगर, माउलीनगर, इंदेवाडी पाण्याची टाकी, राजपूत वाडी, मंठा रोडवरील चौधरीनगर, प्रशांतीनगर, इन्कम टॅक्स कॉलनी, खरपुडी रोडवरील सरस्वती मंदिर परिसर, छत्रपती संभाजीनगर रोडवरील फेज थ्री परिसर, दरेगाव रोड, सिरसवाडी रोड, देवमूर्ती रोड, राजूर रोडवर, नवीन मोंढा परिसर, निधोना रोड आदी परिसरात मोठ्या प्रमाणात नवीन लेआऊट पडून प्लॉटिंग पडत आहे. काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नवीन रोऊस, फ्लॅटसह नवीन प्लॉटिंगही पडू लागली आहे. यामुळे आगामी काही महिन्यांमध्ये शहराचा वेगाने विस्तार वाढणार आहे.

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवा फंडा

ग्राहकांना सुलभ हप्त्यात विक्री करण्यासाठी मासिक सोडत नावाने एक नवाच फंडा वापरला जात आहे. या सोडतीत मोटारसायकल, नॅनो, व्हिस्टा, इंडिका अशा गाड्या भाग्यवान विजेत्यांसाठी ठेवण्यात येत आहेत. सोडतीत बक्षीस निघाल्यास त्याला बक्षीस आणि प्लॉट दिला जातो. शिवाय पुढील हप्ते भरण्याचीसुद्धा गरज राहत नाही. शहरातील अनेक भागांतही ही योजना सुरू आहे.

शहराचा विकास होणार

महानगरपालिका होत असल्यामुळे शहराचा विकास होऊन हद्दवाढ होईल. नवीन रस्ते, रुंदीकरणासह शहराचे सौंदर्यीकरण होईल. बांधकाम क्षेत्रात विशेष करून वाढ होईल, असं कॉन्ट्रॅक्टर एस. जी. देविदान यांनी सांगितले.


No comments:

Post a Comment