Tuesday, November 24, 2020

अनलॉकमध्ये लग्नांचा धुमधडाका ना सोशल डिस्टन्स ना मास्क.

बीड (प्रतिनीधी )- कोरोनाच्या काळात लॉकडाऊन असताना लग्नाला केवळ ५० नागरिकांची उपस्थिती होती मात्र अनलॉक होताच लग्नांचा धुमधडाका सुरू झाला असून आता कोरोना संपलाच आहे, असे वागत लग्नाला हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थिती लावत आहेत. या वेळी कुठलाही सोशल डिस्टन्स पाळला जात नाही, नवरदेवासह एकाही वराडाच्या तोंडाला मास्क लावलेले दिसून येत नाही. त्यामुळे कोरोनाची लाट नव्हे तर त्सुनामीच येऊ शकते, आजपर्यंत बीड जिल्ह्यात १५ हजार १८६ जण पॉझिटिव्ह आले असून पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत ४८० जणांचा मृत्यू झाला असून मृत्यूचा टक्काही झपाट्याने वाढला आहे.

कोरोनाचे संकट गंभीर असताना केवळ विरोधाला विरोध म्हणून काही जण हे उघडा ते उघडा म्हणत आहेत मात्र कोरोनाची दुसरी लाट यायला वेळ लागणार नाही. दिवाळीच्या खरेदीत नागरिकांसह व्यापार्‍यांनी कोरोनाच्या नियमाला धाब्यावर बसवून आपला व्यवसाय केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठा संसर्ग होण्याचा धोका आहे. आजही सार्वजनिक कार्यक्रमात कसलाही सोशल डिस्टन्स, मास्क व सॅनिटायझरचा वापर होत नाही. लग्न समारंभाला कुठलीही परवानगी न घेता हजारो वर्‍हाडी उपस्तिती लावत आहेत. लग्नसमारंभात सॅनिटायझर मास्कचा वापर होत नाही.

आजपर्यंत बीड जिल्ह्यात १५ हजार १८६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून त्यापैकी १४ हजार १५० जणांनी कोरोनावर मात केलेली आहे. यामध्ये ४८० जणांचा मृत्यू झाला असून गेल्या दोन दिवसांपासून शाळा सुरू करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने शिक्षकांच्या टेस्ट घेतल्या आहेत. आतापर्यंत एकूण ४ हजार ४२२ शिक्षकांच्या तपासण्या झाल्या असून त्यापैकी ४४ शिक्षक पॉझिटिव्ह आढळून आले आहे तर ८२६ शिक्षकांचे अहवाल येणे बाकी आहे. अजूनही अनेक शिक्षकांच्या टेस्ट राहिल्या असून त्या घेण्याचे काम आरोग्य विभाग करत आहे.

No comments:

Post a Comment