Wednesday, November 4, 2020

परळीत आवक कमी झाल्याने भाजीपाल्याचे भाव कडाडले.

परळी - अतिवृष्टीमुळे भाजीपाल्याचे अतोनात नुकसान झाले आहे. सध्या बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक कमी असल्याने चढ्या दराने भाजीपाला विकत घ्यावा लागत आहे. शहरात गेल्या कांही दिवसापासून भाजीपाल्याचे भाव कडाडले आहेत. भाजीपाल्याचे भाव वाढल्याने गृहिणींचे अक्षरशः बजेटच कोलमडले आहे.

दरम्यान भाजीपाल्याची आवक अशीच कमी होत राहिल्यास माळव्याचे भाव आजून मोठया प्रमाणात कडाडण्याची शक्यता आहे. याचा फटका सर्वसामान्याला बसणार आहे.शेतकरी आपल्या शेतात वर्षभर पुरेल इतका भाजीपाला लावतात. तसेच शिल्लक असलेला भाजीपाला विक्रीसाठी बाजारात घेऊन येतात. यंदा मात्र हा भाजीपाला मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे. परिणामी आवक घटल्याने भाजीपाला महागला आहे. अतिवृष्टीमुळे बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक घटली आहे. परिणामी भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली आहे.

त्यामुळे सर्वसामान्याचे बजेट कोलमडल्याचे दिसून येत आहे. परिणामी डाळींवर भर वाढल्याचे पहावयास मिळत आहे. यंदा कोरोनाच्या संकटाबरोबरच तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याचा भाजीपाल्यालाही मोठा फटका बसला आहे.

No comments:

Post a Comment