Wednesday, May 13, 2020

पत्रकार संघाच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ सेवा ग्रुप भाग्यनगरने माध्यमातील श्रमिकांना दिला मदतीचा हात.

बीड (प्रतिनिधी);-महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई संलग्न जिल्हा शाखा बीडने माध्यमातील श्रमिक पत्रकार आणि कामगारांना मदतीचे आवाहन प्रशासनाला केले होते. बीडचे कर्तव्यदक्ष तहसीलदार किरण आंबेकर यांनी याची तात्काळ दखल घेऊन श्री स्वामी समर्थ सेवामार्ग केंद्र,भाग्यनगर बीडच्या सेवेकऱ्यांना विनंती केली.त्यांनी ती आनंदाने स्वीकारून आज दिनांक 13 मे रोजी श्री स्वामी सेवा केंद्र भाग्यनगर बीड येथे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातील 150 श्रमिक पत्रकार आणि कामगारांना अन्नधान्यांसह जीवनावश्यक वस्तूंची कीट वाटप केली.या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
कोरोना महामारीमुळे मागील पंचेचाळीस दिवसांपासून संपूर्ण देश लॉक डाऊन करण्यात आला आहे.लॉक डाऊनमुळे इतर विभागाप्रमाणे वृत्तपत्र सृष्टीवर देखील मोठा विपरीत परिणाम झाला आहे.श्रमिक पत्रकार आणि माध्यमात काम करणाऱ्या श्रमिक कामगारांवर देखील मोठी बिकट परिस्थिती ओढावली आहे.अशा गंभीर परिस्थितीमध्ये इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियातील गरजवंतांना मदतीचे हात मिळावेत यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे,प्रदेश संघटक संजय भोकरे,प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे,मार्गदर्शक संतोष मानूरकर यांच्या सूचनेनुसार बीडचे जिल्हाध्यक्ष वैभव स्वामी यांनी अनेक दानशूरांसह जिल्हा प्रशासनाला देखील मदतीसाठी विनंती केली होती.पत्रकार संघाच्या माध्यमातून यापूर्वी जवळपास साडेचारशे गरजवंतांना जीवनावश्यक वस्तूंची कीट विविध माध्यमातून देण्यात आलेली आहे.मात्र तरी देखील माध्यमातील काही गरजवंत अद्याप मदतीपासून वंचित होते. अशा गरजवंतांना मदत मिळावी या केलेल्या आवाहनाला बीडचे तहसीलदार किरण आंबेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. तहसीलदार किरण आंबेकर साहेबांच्या आदेशानुसार तलाठी आंधळे साहेबांनी पुढाकार घेऊन बीड येथील श्री स्वामी समर्थ सेवामार्ग केंद्र,भाग्यनगर बीडच्या सेवेकऱ्यांना विनंती केली.श्री स्वामी समर्थ सेवामार्ग भाग्यनगर केंद्राने तात्काळ प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियातील साठ गरजवंतांना मदत देण्याचे मान्य केले.त्यानुसार जिल्हा सरकारी अभियोक्ता ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अजय राख,पत्रकार संघाचे बीड जिल्हाध्यक्ष वैभव स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ऐनवेळी सुमारे 150 श्रमिक कामगार उपस्थित झालेले असताना देखील गुरु माऊलींच्या आशीर्वादाने परमपूज्य गुरुमाऊली अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वरचे आदरणीय चंद्रकांत दादा मोरे यांच्या शुभ आशीर्वादाने श्री स्वामी समर्थ सेवामार्ग केंद्र भाग्यनगरच्या सेवेकर्‍यांनी माध्यमातील एकाही श्रमिक कामगार आणि पत्रकारांना रिकाम्या हाताने न पाठवता ऐनवेळी शंभर जणांची वाढ झालेली असताना सुद्धा सर्वांना जीवनावश्यक साहित्यासह किराणा अन्नधान्याची किट सन्मानपूर्वक दिली.यामध्ये प्रामुख्याने पाच किलो गहू,तीन किलो तांदूळ,एक किलो साखर, एक किलो तेल,एक किलो बेसन पीठ,मीठ,मिरची,डाळ आदी साहित्य देण्यात आले.यावेळी श्री स्वामी समर्थ सेवामार्ग केंद्र भाग्यनगर बीडचे सर्व सेवेकरी उपस्थित होते.या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment