Monday, March 9, 2026

पवित्र लग्न बंधनाचा मांडला बाजार एका महिन्यात लावलं तिनदा लग्न.पुण्यातील मोठ्या रॅकेटचा बीडमध्ये पर्दाफाश


बीड (प्रतिनिधी) : बीडमधून माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. पुण्यातून चालणाऱ्या एका मोठ्या विवाह रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. पैशांच्या हव्यासापोटी एका 21 वर्षीय निराधार विवाहितेचा वस्तूंसारखा लिलाव करून एकाच महिन्यात तिचे तीन वेगवेगळ्या पुरुषांशी बळजबरीने लग्न लावून दिल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या अमानवीय छळाला कंटाळून पीडितेने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाला वाचा फुटली आहे.
धक्कादायक! एका महिन्यात लावलं तिनदा लग्न; तरुणींचा लिलाव करण्याऱ्या पुण्यातील मोठ्या रॅकेटचा बीडमध्ये पर्दाफाश

असा झाला पीडितेचा सौदा

लातूर येथील रहिवासी असलेल्या या पीडित तरुणीचे पहिले लग्न दोन वर्षांपूर्वी बीडमध्ये झाले होते. मात्र, पतीच्या अनैतिक संबंधांमुळे ती माहेरी परतली होती. दरम्यान, आजी-आजोबांच्या निधनानंतर ती पूर्णपणे निराधार झाली. याच परिस्थितीचा फायदा घेत तिच्या शेजारी राहणाऱ्या एका महिलेने तिला पुण्यातील हडपसर भागातील महानंदा नावाच्या एजंटकडे नेले.तुझे चांगले दुसरे लग्न लावून देते, असे आमिष दाखवून तिला पुण्यात आणण्यात आले, मात्र तिथे तिच्या आयुष्याचा बाजार मांडला गेला.

एका महिन्यात तिनदा विकले!

पीडितेने दिलेल्या जबाबातून या रॅकेटचे भयानक वास्तव समोर आले आहे. एजंट महानंदाने कात्रज येथील एका व्यक्तीकडून 5 लाख रुपये घेऊन पीडितेचे पहिले लग्न लावले. तिथे ती केवळ 10 दिवस राहिली. त्यानंतर तिला कुरुक्षेत्र येथील एका व्यक्तीला 4 लाख 30 हजार रुपयांत विकले गेले. तिथे तिला फक्त 5 दिवस ठेवण्यात आले. इतक्यावरच न थांबता, तुळजापूरच्या एका महिलेच्या मदतीने कानडी बुद्रुक येथील एका पुरुषाकडून पुन्हा 4 लाख 30 हजार रुपये उकळले आणि 1 मार्च 2026 रोजी तिचे तिसरे लग्न लावून दिले.

*चौथ्या लग्नाचा फोन आला आणि...

तिसऱ्या लग्नानंतरही या नराधम एजंटचे मन भरले नव्हते. एजंट महानंदाच्या पतीने पीडितेशी संपर्क साधून तुझ्यासाठी अजून एक चांगले स्थळ आले आहे, तुझे चौथे लग्न लावून देतो, असे धमकावून सांगितले. सततची विक्री आणि होणाऱ्या शारीरिक-मानसिक त्रासामुळे ही तरुणी पूर्णपणे खचली होती. अखेर, नैराश्यातून तिने विष प्राशन करून आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांत गुन्हा दाखल

पीडितेवर सध्या आष्टी तालुक्यातील मिरजगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिथे तिने पोलिसांकडे आपला जबाब नोंदवला आहे. पीडितेच्या तक्रारीवरून आष्टी पोलिसांनी महानंदा (हडपसर, पुणे), तिचा पती आणि तुळजापूरची बालिका नावाच्या महिलेसह अन्य आरोपींविरुद्ध शनिवारी गुन्हा दाखल केला आहे. या रॅकेटमध्ये आणखी किती तरुणींचे बळी गेले आहेत, याचा शोध आता पोलिस घेत आहेत.

No comments:

Post a Comment