पुणे (प्रतिनिधी): राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी आणि दहावीच्या परीक्षेत यंदा सीसीटीव्ही यंत्रणेमुळे पुराव्यासह ‘मास काॅपी’चे प्रकार उघड झाले. या प्रकरणी आतापर्यंत एकूण ८१ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे, अशी माहिती राज्य मंडळाने परिपत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले.
अधिक माहितीनुसार, बारावी बाेर्ड परीक्षेत बीड जिल्ह्यात चाैसाळा येथील कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात (केंद्र क्रमांक २२४) काॅपी प्रकार झाल्याचे उघड झाले आणि प्रशासनाने येथील १७ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून निलंबित केले आहे. पहिल्याच पेपरला अर्थात १० फेब्रुवारीला हा प्रकार घडला हाेता.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालय जैतापूर येथे केंद्र क्रमांक-००७९ येथे मास काॅपीचा प्रकार घडला. यात पर्यवेक्षक केंद्र संचालक, प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सहकार्य करत असल्याचे सीसीटीव्हीवरून निदर्शनास आल्याने संबंधित २४ जणांविरुद्ध गुन्हा नाेंदवला असून, २१ जणांना निलंबित केले आहे. याचबराेबर जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यात केंद्र क्रमांक- ०४३९, ०४२३ आणि ०४२१ येथे इंग्रजी विषयाच्या पेपरला विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले आहेत. त्यांच्यावर नियमाप्रमाणे कार्यवाही केलेली आहे. तसेच पर्यवेक्षक म्हणून नियुक्त ०५ शिक्षकांवर निलंबनाची कार्यवाही केलेली आहे.
धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यातील परीक्षा केंद्र क्र. ३९३ जि. प. हायस्कूल, सलगरा येथे १८ फेब्रुवारी रोजी रसायनशास्त्र या विषयाला नऊ विद्यार्थी गैरमार्ग करीत असताना आढळून आले. यात सहा विद्यार्थ्यांकडे मोबाइल आढळून आले. या प्रकरणी संबंधित संस्थेतील तीन शिक्षक निलंबित केले, तसेच जिल्हा परिषद तीन कर्मचाऱ्यांचे निलंबन प्रस्तावित केले आहे.
No comments:
Post a Comment