Tuesday, March 10, 2026

घरगुती कामावरून आई-वडिल रागावल्यामुळे एकुलत्या एक मुलाचे टोकाचे पाऊल, शेतात जाऊन संपवले जीवन.


आष्टी (प्रतिनिधी): आई-वडील घरगुती कामाकडे दुर्लक्ष केल्यावरून रागवल्याने, त्याचा राग मनात धरून २१ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना आष्टी तालुक्यातील सांगवी (पाटण) येथे मंगळवारी सकाळी घडली. विराज हरिदास भगत असे मृत तरुणाचे नाव आहे.

नेमकी घटना काय?

विराज हा घरच्या कामात मदत करत नसल्याने त्याचे आई-वडील त्याच्यावर रागावले होते. पालकांनी टोकल्याचा राग मनात धरून विराजने मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास गावातील 'काळशेत' शिवारातील सर्व्हे नं. ११९ मधील आपल्या शेतात जाऊन आंब्याच्या झाडाला गळफास घेतला. शेतात गेलेल्या त्याच्या बहिणीच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर ही हृदयद्रावक घटना समोर आली.

उपचारापूर्वीच प्राणज्योत मालवली.

घटनेची माहिती मिळताच पालकांनी धाव घेऊन त्याला तातडीने खाली उतरवले आणि कडा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. विराजच्या पश्चात आई, वडील आणि एक बहीण असा परिवार आहे. धामणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले असून, कडा पोलीस चौकीचे पोलीस हवालदार भाऊसाहेब आहेर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनेचा पंचनामा केला आहे.

No comments:

Post a Comment