Saturday, May 22, 2021

परळी शहरातील लसीकरणाचा सावळा गोंधळ थांबवा-श्रीनिवास देशमुख


परळी वैजनाथ (प्रतिनिधी)ः-
आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे परळीत कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा बोजवारा उडाला असून या प्रकरणी आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष घालून लसीकरणाचे काम सुरळीत करावे अशी मागणी शरद पवार विचार मंचचे बीड जिल्हाध्यक्ष श्रीनिवास देशमुख यांनी केली आहे.
पालकमंत्री ना.धनंजय मुंडे, जिल्हाधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी व इतर संबंधितांना दिलेल्या निवेदनात श्री देशमुख यांनी ही मागणी केली आहे. परळी शहरात गेल्या कांही दिवसापासून लसीकरणाबाबत कोणतीही सुसूत्रता नाही. आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांच्या बेफिकीरी कारभारामुळे लसीकरणाचे नियोजन नाही. दीड लाख लोकसंख्येच्या परळी शहरात केवळ तीन लसीकरण केंद्र आहेत. तेही नियमित चालू नाहीत. लसीकरणाबाबत नागरिकांना कोणतीच माहिती दिली जात नाही. केंव्हा, कोणाचे आणि कुठे लसीकरण होणार हे कळविले जात नाही. यामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठी हेळसांड सध्या सुरू आहे. शहरात प्रभाग निहाय लसीकरण केंद्र सुरू करावेत ही मागणी नागरिकांकडून होवूनही याबाबत कोणतीच दखल घेतली जात नाही. यामुळे आरोग्य विभागाच्या कारभाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे.
शनिवारी शहरातील नटराज रंग मंदिर येथे 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण केले जाणार होते. परंतु केंद्रावर लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना लसीकरण न करताच परत पाठवले गेले. विविध कारणे यावेळी संबंधितांनी सांगितली. यामुळे उन्हातान्हात आलेल्या व केंद्रावर रांगेत तासनतास थांबलेल्या ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय झाली. या संपूर्ण प्रकारास आरोग्य विभागाचा ढिसाळ कारभार जबाबदार असल्याचा आरोप श्री देशमुख यांनी केला आहे. लसीकरण झालेल्या नागरिकांची नोंद होत नाही, त्यांना पुढच्या लसीकरणाबाबत कोणतेही संदेश येत नाहीत. त्यामुळे आणखीन गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. लसीकरण केंद्रावर एकही वरिष्ठ अधिकारी उपस्थित रहात नाहीत.
या प्रकरणी वरिष्ठांनी लक्ष घालावे व शहरातील लसीकरण सुरळीत करावे अशी मागणी श्रीनिवास देशमुख यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment