Tuesday, February 3, 2026

लग्नात बदनामी होईल या भीतीने मित्राची हत्या करणारा 'नवरदेवाला' अटक बीड एलसीबीची कारवाई.


बीड (प्रतिनिधी) पाटोदा तालुक्यातील डोंगरदेवी दगडवाडी शिवारात सोमवारी सकाळी रक्ताच्या थारोळ्यात सापडलेल्या चांद ऊर्फ गुड्डू तांबोळी (वय ३०) याच्या निर्घृण हत्येचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, चांदचा मित्र अतिक तांबोळी यानेच दीड लाख रुपयांच्या वादातून ही हत्या केल्याचे उघड झाले असून, पोलिसांनी त्याला मध्यरात्री बीड शहरातून बेड्या ठोकल्या आहेत.

लग्नातील गोंधळाच्या भीतीने केला खून.

पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मृत चांद याचे आरोपी अतिककडे १ लाख ५० हजार रुपये होते. तो या पैशांचा सतत तगादा लावत होता. विशेष म्हणजे, आरोपी अतिक याचे सोमवारीच लग्न होणार होते. "पैसे दिले नाहीत तर तुझ्या लग्नात येऊन गोंधळ घालेन," असा इशारा चांदने दिला होता. यामुळे चिडलेल्या आणि लग्नात बदनामी होईल या भीतीने ग्रासलेल्या अतिकने रविवारी रात्री चांदला गाठले आणि दगडाने ठेचून त्याची निर्घृण हत्या केली.

एलसीबीची वेगवान चक्रे

सोमवारी सकाळी घटना उघडकीस येताच परिसरात दहशतीचे वातावरण होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. उपनिरीक्षक श्रीराम खटावकर व त्यांच्या पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे अवघ्या २४ तासांत आरोपी अतिक तांबोळीला बेड्या ठोकल्या.

काय घडले होते त्या रात्री?

चांद रविवारी बीडला आला होता, तेव्हापासून तो बेपत्ता होता. त्याने पुतण्याला फोन करून "गाडी हॉटेलवरून घेऊन जा, मला उशीर होईल," असे सांगितले होते. ही त्याची शेवटची विचारपूस ठरली. ज्या मित्राच्या लग्नासाठी सर्व तयारी झाली होती, त्याच मित्राने दीड लाखांसाठी चांदचा काटा काढल्याने रायमोह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment