Tuesday, September 5, 2023

कधीकाळी हॉटेलमध्ये काम करणारा बीडचा भूमिपुत्र, अंतरवालीला देशात मिळवून दिली ओळख.

गेवराई (प्रतिनिधी) - मराठा आरक्षणाची ४० वर्षांपूर्वीची मागणी आहे. या मागणीसाठी जगाला हेवा वाटावा असे शांततेतील मूकमोर्चे आणि ठोक मोर्चात समाजातील ४१ लोकांचे बलीदान जाऊनही समाजाच्या हाती काही पडले नाही. मात्र, मागच्या पाच वर्षांपासून मागे पडलेला मुद्दा मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या आंदोलनामुळे जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी (ता. अंबड) देशाच्या नकाशावर ठळक आणि सध्या सर्व सत्तेचे लक्ष असलेले ठिकाण झाले आहे. विशेष म्हणजे या आंदोलनाने सरकार देखील हादरले आहे.
ही किमया करणारे मनोज जरांगे बीड जिल्ह्यातील भूमिपुत्र आहेत. त्यांचे गाव मातोरी (ता. शिरूर कासार) आहे. सासुरवाडीला स्थायीक झाल्यानंतर शिवबा संघटनेची स्थापना करून ते मराठा आरक्षण चळवळीत सक्रिय आहेत.त्यांच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी कधीकाळी हॉटेलमध्येही काम केले. सामाजिक कार्याची आवड त्यांच्या रक्तातच आहे. बारावी उत्तीर्ण मनोज जरांगे यांच्या कुटुंबात पत्नी, चार मुले, तीन भाऊ व आई - वडील आहेत. मातोरी येथे शेतजमीन कमी असल्यामुळे मनोज जरांगे त्यांची सासरवाडी असलेल्या समर्थ कारखाना येथे वास्तव्यास गेले.तेथे त्यांना चार एकर जमीन होती. परंतु मराठा आरक्षणाचा ध्यास मनात असल्याने त्यांनी चळवळ उभी करत मराठा आरक्षणासाठी दोन एकर जमीन विकून टाकली. त्यांनी कधीकाळी जालनात काँग्रेसमध्येही काम केले. शिवबा संघटनेच्या माध्यमातून महानाट्याच्या निमित्ताने ते प्रकाशझोतात आले. २०१४ ला शाहगड ते मुंबई पायी फेरी व छत्रपती संभाजीनगर येथील त्यांच्या नेतृत्वाखालील मोर्चाही गाजला होता.
हळूहळू शिवबा संघटना आक्रमक होत गेली. कोपर्डी (जि. अहमदनगर) येथील अत्याचार प्रकरणातील आरोपींना फाशी द्या या प्रमुख मागणीसाठी त्यांनी आंदोलन केले. यावेळी या प्रकरणातील आरोपींना न्यायालयाबाहेर मारहाणही जरांगे पाटील यांच्या समर्थकांनी केली होती. या मारहाण प्रकरणी बाबूराव वालेकर, राजेंद्र जर्हाड, अमोल कोल्हे, गणेश कोल्हे या चार युवकांना दोन वर्षांची शिक्षा झाली होती. त्यांनी २०२१ मध्ये अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव येथे तब्बल तीन महिन्यांचे ठिय्या आंदोलनही केले.
सर्वांची नजर आता अंतरवालीवरअंबड तालुक्यातील पैठण फाटा येथे पुन्हा त्यांनी मराठा आरक्षण मिळावे म्हणून जन आक्रोश मोर्चा काढला होता. त्यामध्ये सरकारकडून कोणतीच दखल घेतली जात नसल्याने त्यांनी अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मराठाट आरक्षणासाठी बेमुदत उपोषणाची हाक दिली. आता राज्य सरकारचा हा सर्वात प्रमुख मुद्दा झाला असून सरकारही हादरले आहे. माध्यमांची आणि सर्वच राजकीय पक्षांच्या बड्या नेत्यांची नजर आता अंतरवालीवरच आहे. मात्र, अंतरवाली नकाशावर आणणारे मनोज जरांगे जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत.

No comments:

Post a Comment