Tuesday, September 5, 2023

अंबाजोगाईत महाविकास आघाडीचा जनअक्रोश मोर्चा.कृषीमंत्र्यांना जिल्ह्यात पाय ठेऊ देणार नाही.

अंबाजोगाई (प्रतिनिधी) : पाऊस नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. परंतु शासनाकडून कोणताही निर्णय होत नाही. या विरोधात  बीडच्या अंबेजोगाईत महाविकास आघाडीतर्फे जणआक्रोश मोर्चा काढत सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. तसेच बीड जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर, करा अन्यथा कृषीमंत्र्यांना जिल्ह्यात पाय ठेऊ देणार नाही; असा इशारा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिला आहे.
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून महाविकास आघाडीकडून जणआक्रोश मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर हा मोर्चा मुख्य मार्गाने उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चात बैलगाडी देखील होती. या मोर्च्याच्या माध्यमातून दुष्काळ जाहिर करून शेतकर्‍यांना सरसकट १ लाख रूपये मदत करावी. १०० टक्के पिक विमा मंजुर करावा. २५ टक्के पीकविमा अग्रीम देण्यात यावे. विद्यार्थ्यांचे सर्व शैक्षणिक शुल्क व शेतकर्‍यांचे वीज बील माफ करावे. जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करून जनावरांना चारा व जनतेला मोफत स्वस्त धान्य उपलब्ध करावे.  एम.आर.ई.जी.एस.(रोहयो) अंतर्गत कामे सुरू करण्यात यावीत. यासह विविध मागण्यांसाठी आज जन आक्रोश करण्यात आला.

तर कृषिमंत्री पदाचा राजीनामा द्या 

बीड जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा, अन्यथा कृषीमंत्र्यांना जिल्ह्यात पायी ठेवून दिला जाणार नाही असा संतप्त इशारा महाविकास आघाडीने दिला आहे. तसेच मोर्चात कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत कृषिमंत्री पदाची जबाबदारी पार पाडता येत नसेल तर राजीनामा द्या अशी मागणी देखील करण्यात आली.

No comments:

Post a Comment