परळी वैजनाथ (प्रतिनिधी):दै.मराठवाडा साथी चे ज्येष्ठ संपादक, मनमिळावू व प्रगल्भ व्यक्तिमत्व असलेले सतीशजी बियाणी यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठवाड्यातील पत्रकारिता, समाजकार्य आणि सांस्कृतिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
सतीशजी बियाणी हे केवळ संपादक नव्हते तर समाजातील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून जनतेपर्यंत सत्य व निष्पक्ष बातम्या पोहोचविणारे निर्भीड पत्रकार होते. त्यांनी आपल्या लेखणीद्वारे समाजातील ज्वलंत प्रश्नांना नेहमीच वाचा फोडली.
त्यांचे व्यक्तिमत्व अतिशय आत्मीय व मनमिळावू होते. प्रत्येकाशी जिव्हाळ्याने संवाद साधणे, प्रोत्साहनाचे दोन शब्द देणे, आणि आपलेपणा निर्माण करणे हा त्यांचा स्वभाव होता. मी स्वतः 27 ऑगस्ट 2025 रोजी माझ्या वाढदिवशी त्यांचा फोन आला होता, त्यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि दै. मराठवाडा साथी मध्ये माझ्या विषयी लेख छापून मला आत्मिक आनंद दिला होता.
सतीशजींची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण जडणघडण म्हणजे त्यांची धार्मिक निष्ठा. दररोज ते श्री वैद्यनाथ प्रभूंच्या मंदिरात दर्शनाला जात असत. त्या वेळेस आमचा नेहमी नमस्कार व्हायचा. त्यांच्या या अध्यात्मिक श्रद्धेने त्यांच्या व्यक्तिमत्वात आणखी माधुर्य आणले होते.
समाजातील विविध घटकांना एकत्र आणणे, पत्रकारितेतून सकारात्मक बदल घडवणे, वाचकांचा विश्वास जपणे या त्यांच्या वाटचालीमुळे मराठवाडा साथी हे नाव घराघरात पोहोचले.
त्यांच्या निधनाने पत्रकारितेतील एक प्रभावी आवाज कायमचा हरपला आहे. त्यांचे मार्गदर्शन, आपुलकी आणि समाजहिताचा विचार करण्याची वृत्ती ही सदैव प्रेरणादायी ठरेल.
सामाजिक कार्यकर्ते शिवकुमार केदारी, हिंद नगर, परळी वैद्यनाथ यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना सांगितले की, “सतीशजींच्या आठवणी सदैव प्रेरणादायी राहतील. त्यांचा आत्मीय स्वभाव व समाजहिताची तळमळ नेहमी स्मरणात राहील.”
सतीशजी बियाणी यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांच्या स्मृती समाजमनात सदैव जिवंत राहतील.
No comments:
Post a Comment