Friday, September 12, 2025

दैनिक मराठवाडा साथीचा आधारवड कोसळला.

पत्रकारिता, समाजसेवा, धर्मभाव आणि दिलदार स्वभावाचा मिलाफ असणारे दैनिक मराठवाडा साथी चे संपादक सतीशशेठ बियाणी हे आज आपल्यात राहिले नाहीत. दीर्घ आजाराशी झुंज देत असताना त्यांची प्राणज्योत मालवली आणि मराठवाडा साथी परिवाराने आपला खरा आधारवड गमावला आहे. मुख्य संपादक स्व. मोहनलालजी काकाजी बियाणी यांचा पत्रकारितेचा वारसा अखंडपणे पुढे चालवणारे सतीशशेठ हे खर्‍या अर्थाने वाक्यमूर्ती होते. पत्रकारितेतील सचोटी, निष्ठा आणि तळमळ त्यांच्या कार्यात नेहमीच दिसून येत होती.
सतीशशेठ यांचा आग्रह नेहमीच असा असायचा की प्रत्येक वार्ताहराची बातमी आपल्या पेपरमध्ये यावी. प्रत्येक वार्ताहराशी ते थेट संपर्कात राहायचे. कुणाला अडचण आली तर ती सोडवणे, त्यांच्या कुटुंबीयांकडे लक्ष देणे, आनंदात सहभागी होणे किंवा दुःखात धीर देणे, हे त्यांचे वैशिष्ट्य होते.
प्रत्येक कर्मचाऱ्याला त्यांनी आपल्या मुलासारखे जपले. दहा दिवस आजारी असल्यामुळे त्यांचे बोलणे झाले नाही, ही खंत मनाला कुरतडते. कारण आयुष्यातला असा एकही दिवस मला आठवत नाही की ज्यादिवशी त्यांचा फोन आला नाही. सकाळ, दुपार आणि संध्याकाळ असे तीन वेळा ते माझ्याशी बोलायचे – हा संवादच जणू आमच्या नात्याचा श्वास होता.
सुरुवातीच्या काळात मराठवाडा साथी ची छपाई मोंढा येथील जगदीश प्रिंटिंग प्रेसमध्ये होत असे. मात्र कालांतराने सतीशशेठ यांच्या दूरदृष्टीमुळे मराठवाडा साथी अत्याधुनिक ऑफसेट मशिनवर प्रकाशित होऊ लागला. आज हा पेपर मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या अनेक भागात पोहोचतो, हे त्यांच्या अथक परिश्रम आणि व्यवस्थापनशैलीचे फळ आहे. ते नेहमी म्हणायचे, “पेपर हा समाजाचा आरसा आहे; त्यात सत्य उमटलेच पाहिजे.” या तत्त्वावर त्यांनी पत्रकारितेची दिशा दिली.
सतीशशेठ यांचा स्वभाव अतिशय मायाळू होता. कर्मचारी वर्गाला ते नेहमी आपल्या कुटुंबाचा भाग मानायचे. कुणाचीही छोटीशी अडचण असली तरी ती स्वतःच्या जबाबदारीवर घेऊन सोडवायचे. म्हणूनच मराठवाडा साथी हा केवळ वृत्तपत्र नसून एक जिव्हाळ्याचे कुटुंब आहे, अशी भावना सर्वांच्या मनात आहे. आज या दिलदार व्यक्तिमत्वाचा अंत झाला असला तरी त्यांची आठवण, त्यांचे संस्कार आणि त्यांचे कार्य आमच्यासाठी प्रेरणादायी राहील.
त्यांच्या निधनाची बातमी ऐकून मनाला मोठा धक्का बसला. पत्रकारितेचे एक युग संपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.अशा मनमिळावू, दिलदार आणि भक्तिभावाने ओथंबलेल्या व्यक्तिमत्वाला मी वैयक्तिकरित्या आणि संपूर्ण मराठवाडा साथी परिवाराच्या वतीने शतशः नमन करतो.
त्रिवार अभिवादन!

चौकट 
*धार्मिकता आणि भक्तिभाव*
सतीशशेठ हे प्रभू वैद्यनाथाचे अखंड भक्त होते. दररोज सकाळ, दुपार व संध्याकाळ तीन वेळा ते नित्य दर्शनाला जात असत. त्यांच्या भक्तिभावामुळेच त्यांचे मन सदैव शांत आणि स्थिर राहिले. धर्माशी जोडून समाजकार्य करणे हे त्यांचे ब्रीद होते.

माझ्यासाठी परिवारासारखा संबंध

सन १९९३ पासून मी मराठवाडा साथी सोबत कार्यरत आहे. त्या दिवसापासून आजपर्यंत प्रत्येक टप्प्यावर सतीशशेठ यांचे मार्गदर्शन, प्रेम आणि पाठबळ माझ्यासोबत राहिले. हा प्रवास केवळ नोकरीचा नव्हता तर एक कुटुंबाचा होता. सतीशशेठ हे माझ्यासाठी संपादक नसून परिवाराचे ज्येष्ठ आधारस्तंभ होते. त्यांनी मला घडवले, वाढवले आणि आज मी जो काही आहे तो त्यांच्या कृपाशिर्वादाने आहे.

               *संतोष जुजगर*
                 परळी वैजनाथ

No comments:

Post a Comment