Wednesday, October 2, 2024

नवरात्र ९ दिवस उपवास करताय! तर लक्षात ठेवा ५ नियम, पित्त होऊन तब्येत बिघडणार नाही.





(कांतीकारी साथी विशेष) शारदीय नवरात्रोत्सवाला अवघ्या काही दिवसांत सुरूवात होणार आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांत मनोभावे देवीचा आराधना केली जाते. अनेकजण ९ दिवसांचे उपवासही ठेवतात. उपवास ठेवण्याची प्रत्येकाची कारणं वेगवेगळी असतात काहीजण पोटाला आराम मिळावा म्हणून तर काहीजण धार्मिक कारणांमुळे उपवास ठेवतात. 

उपवास केल्यामुळे अनेकांना थकवा जाणवतो, अशक्तपणा येतो, शरीरात पोषक तत्वांची कमतरता भासते तर काहींचं वजन कमी होण्याऐवजी अधिकच वाढतं. नवरात्रीत  ९ दिवसांच्या उपवासाचा  त्रास होऊ नये म्हणून या उपवासाला काय खावं, काय अजिबात खाऊ नये याचे सोपे नियम न्युट्रिशनिस्ट आणि वेट लॉस मॅनेजमेंट अडव्हायजर  मंजिरी कुलकर्णी  यांनी सांगितले आहेत.  

उपवासाला काय खाऊ नये?

मंजिरी कुलकर्णी सांगतात की उपवासाच्या दिवसांमध्ये साबुदाणा आणि बटाटा हे दोन पदार्थ मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. पण उपवासामुळे  होणारं शरीराचं नुकसान टाळण्यासाठी साबुदाणा आणि बटाटा हे दोन्ही पदार्थ खाऊ नये. या पदार्थांच्या सेवनानं उपवासाच्या दिवशी जास्त कॅलरीज घेतल्या जातात. साबुदाणा हाय कॅलरी फूड आहे, खासकरून जे लोक जास्त धावतात, एथलिट असतात त्यांनीच साबुदाणा खावा. ज्यांचे वजन जास्त आहे, ज्यांना डायबिटीस त्यांनी बटाटा,साबुदाणा खाणं टाळायला हवं.

उपवासाच्या दिवसांत काय खावं? 

उपवासात सर्वात उत्तम खाण्याचा पदार्थ म्हणजे राजगिरा. राजगिऱ्यात कॅल्शियम असते, पचायला जड असतो.  त्यामुळे राजगिरा खाल्ल्यानंतर पटकन भूक लागत नाही. राजगिऱ्याचे थालिपीठ, उपमा, दशमी, राजगिऱ्याच्या लाह्या असे पदार्थ करून तुम्ही खाऊ शकता. बटाट्याऐवजी रताळे उकळून खाऊ शकता.  या प्रकारचा आहार घेतल्यानं मानसिक शांतताही राहते. 

शरीर हायड्रेट ठेवा. फळं, फळांचा रस आहारात घ्या. फक्त सकाळी उठल्या उठल्या फळं खायला जाऊ नका, भूक लागण्याची वाट पाहा, भूक  लागली नसेल तर जबरदस्ती खाऊ नका. दिवसभरात कधीही १ ग्लासभर ताक पिऊ शकता, लिंबू पाणी, आवळ्याचं सरबत कोकम सरबत घेऊ शकता. उपवासाच्या वेळेत बरेचजण जास्त प्रमाणात खातात ते टाळायला हवं. ज्यामुळे गॅस, पित्त, एसिडिटी होते.

उपवास कोणी करू नये

अनकंट्रोल डायबिटीस,  डेंग्यु, मलेरिया, टि.बी  यांसारखा मोठा आजार होऊन गेला आहे, प्रेग्नंसी सुरू आहे, तुम्ही ब्रेस्ट फिडींग करत आहात, सिव्हीअर एसिडीटी, डोकेदुखी, मायग्रेनचा त्रास असेल तर उपवास न केलेलाच चांगला.

उपवास करण्याचे फायदे 

मानसिक शांतता, अध्यात्मिक शांतता, डिटॉक्सिफिकेशन, कॅलरी कंट्रोल हे फायदे होतात. उपवास केल्यामुळे अंगावरची सूज कमी होऊ शकते, अंग जड होत नाही. पण उपवासात तळलेले पदार्थ , दूधाचा वापर अति केल्यास उलटे परिणाम होतात, वजन आणि शुगर लेव्हल वाढते.

No comments:

Post a Comment