Monday, October 27, 2025

दिव्य ज्योती जागृती संस्थेच्या वतीने आयोजित देवी भागवत कथा.शक्तीची जाणीव झाल्यावरच मनातील महिषासुरा चा नाश - साध्वी अदिती भारतीजी.

अंबाजोगाई (प्रतिनिधी) दिव्य ज्योती जागृती संस्थेच्या वतीने अंबाजोगाई येथे सुरू असलेल्या सात दिवसीय श्रीमद् देवी भागवत ज्ञानयज्ञ कथेत तिसऱ्या दिवशी भव्य विजयादशमी उत्सव साजरा करण्यात आला. मराठी भक्तिगीतांनी संपूर्ण परिसर श्रद्धा-भक्तीने दुमदुमला.
या प्रसंगी कथाव्यास साध्वी अदिती भारतीजी यांनी महिषासुर वधाच्या प्रसंगाचे सखोल विवेचन करताना सांगितले की, “महिषासुर हा केवळ पौराणिक पात्र नाही, तर आज समाजात पसरलेल्या हिंसाचार, स्त्रियांवरील अत्याचार आणि दिशाभूल झालेल्या तरुणाईच्या रूपातील विकृत मनोवृत्ती हेच आधुनिक महिषासुराचे रूप आहे.”भारतीय धर्मग्रंथांमध्ये दडलेली असाधारण तत्त्वज्ञान आणि मातृशक्तीच्या उदात्त परंपरेचा उल्लेख करताना साध्वीजी म्हणाल्या, “इतिहासात जेव्हा-जेव्हा स्त्रियांवर अन्याय झाला, तेव्हा-तेव्हा शक्तिरूपिणी स्त्रीने अत्याचाराला आव्हान देत समाजपरिवर्तन घडवून आणले. राणी जिजाऊंपासून ते स्वातंत्र्य सैनिकांपर्यंत अनेकांनी शक्तीचा जागर करून भारताची संस्कृती जपली असेही त्या म्हणाल्या.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, महापुरुषांनी ब्रह्मज्ञानाद्वारे प्रत्येक हृदयात देवीची जागृती केली आणि मानसिक गुलामगिरीची बेडी तोडून समाजक्रांतीची प्रेरणा दिली. जयस्तुते, वंदे मातरमच्या सुरावटीत सभागृह देशभक्तीच्या उत्साहाने भरून गेले.
विजयादशमीचे महत्त्व स्पष्ट करताना साध्वीजी म्हणाल्या, “दरवर्षी विजयादशमीचा सण येतो, दुर्गादेवीची पूजा होते, रावण दहन होते; परंतु खरा विजय त्या दिवशी होईल जेव्हा मानवाच्या अंतर्मनात वास करणारा महिषासुर नष्ट होईल आणि सकारात्मकता व सद्भावनेने समाजात धर्मस्थापना होईल.” यासाठी सद्गुरुंनी दिलेल्या ब्रह्मज्ञानाची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला श्री बबनभैया लोमटे, राहुल देशपांडे, प्रकाशजी तालमार्तंड बोरगांवकर सर, श्री नाना गायकवाड व मा. बळीरामजी चोपणे यांसह विविध मान्यवरांनी उपस्थित राहून देवीचे आशीर्वाद घेतले.
 
अंबाजोगाईत घेण्यात येत असलेल्या या कथेस भाविकांची अलोट गर्दी उसळली असून, पुढील दिवसांची उत्सुकता अधिक वाढली आहे.

No comments:

Post a Comment