नांदेड (प्रतिनीधी) सहकार चळवळीत महाराष्ट्राचा सर्वात मोठा वाटा आहे. शंभर वर्षांपासूनचा मोठा इतिहास आहे.
सहकार क्षेत्राच्या माध्यमातून ग्रामिण भागातील अर्थकारण सुधारण्यासाठी मोठा फायदा झाला आहे. आता बॅंकांचे क्षेत्र वाढले असून सहकारी बॅंका, नागरी बॅंका,पतसंस्थाकडे बघण्याचा रिझर्व्ह बॅंकेचा दृष्टीकोन अधिक चांगला असायला पाहिजे.नितीन गडकरी यांच्याप्रमाणेच केंद्र सरकारमधील सर्वांनी विकासकामात सहकार्याची भूमिका ठेवली तर अपेक्षित विकास साधता येईल. सहकार क्षेत्र अधिक चांगल्या पद्धतीने वाढण्यासाठी सर्वांनीच व्यापक होणे आवश्यक असल्याचे मत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले.
*अपयश झाकण्यासाठी भाजपचे नेते शरद पवार यांची बदनामी करु लागले;धनंजय मुंडे*
नांदेड शहरातील तरोडा नाका भागात गोदावरी अर्बन मल्टिस्टेट को-ऑप सोसायटीच्या ‘सहकारसूर्य’ मुख्यालयाचे उद्घाटन पूर्णा रोड येथे शनिवारी सकाळी दहा वाजता खासदार शरद पवार यांच्या हस्ते झाले.त्यानंतर आयोजित कार्यक्रमात श्री. पवार बोलत होते. यावेळी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे,पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे,माजी मंत्री सुर्यकांता पाटील,अर्जुन खोतकर,कमलकिशोर कदम, जयप्रकाश दांडेगावकर, भास्करराव पाटील खतगावकर, डॉ.माधव किन्हाळकर,खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार संतोष बांगर, आमदार राजेश पवार,आमदार राम पाटील रातोळीकर,संत बाबा बलविंदरसिंगजी, सुर्यकांत देसाई गुरूजी,रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर,राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे,फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट को-ऑप सोसायटीचे अध्यक्ष सुरेश वाबळे, बँक कर्मचारी संघटनेचे सचिव देविदास तुळजापूरकर यांच्यासह आजी-माजी लोकप्रतिनिधींची उपस्थिती होती.या सोहळ्याला केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ऑनलाईन भाषण केले.
गोदावरी अर्बनचे संस्थापक अध्यक्ष खासदार हेमंत पाटील, अध्यक्षा राजश्री पाटील व व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांनी स्वागत केले. खासदार पवार म्हणाले की, गेल्या दहा वर्षात गोदावरी अर्बनने चांगल्या पद्धतीने काम करून नावलौकिक कमावला आहे. नांदेड ही पवित्र भूमी असून शिक्षण क्षेत्रात नाव झालेल्या एमजीएमची सुरूवात देखील नांदेडमधूनच झाली आहे. गोदावरी अर्बनने त्यांची ओळख महाराष्ट्रासह इतर राज्यातही निर्माण केली आहे.
नांदेड आणि आजूबाजूच्या जिल्ह्यात शेतीमध्ये मिळणाऱ्या उत्पादनातून प्रक्रिया करणारे उद्योग या भागात यायला हवेत.साखरेसह इतर उत्पादने साखर कारखान्यांनी सुरू केली त्याप्रमाणे आता सोयाबीन,हळद या पिकांकडे लक्ष दिले पाहिजे. त्यासाठी खासदार हेमंत पाटील यांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांमध्ये याबाबत जागृती करून याचेही उत्पादन व त्यावरील प्रक्रिया उद्योगासाठी चालना दिली पाहिजे.शेतकरी तसेच तरूण,महिलांसाठी छोटे उद्योग सुरू करून त्यांचा आर्थिकस्तर उंचावण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असे सांगून श्री.पवार म्हणाले की, देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी सहकार क्षेत्राची मदत होणार आहे.त्यामुळे सहकार क्षेत्रात नेतृत्व करणाऱ्यांनी त्याच बरोबर छोटे मोठे कर्ज घेणाऱ्यांनी देखील ते व्याजासह वेळेवर परत करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. तर सहकार क्षेत्राला आणखी बळकटी येईल.श्री.मुंडे यांनी गोदावरी अर्बनचा विस्तार महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि विशेष म्हणजे गुजरात राज्यात होतो, ही अभिमानास्पद बाब आहे.बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाला बळकटी दिल्याबद्दल त्यांनी अध्यक्षा राजश्री पाटील यांचेही कौतुक केले.
केंद्रीय मंत्री गडकरी यांनी ऑनलाईऩ भाषणातून उपस्थिती लावली.सहकारात विश्वासार्हता आणि नेतृत्व महत्वाचे असते आणि ते काम हेमंत पाटील व राजश्री पाटील यांनी गोदावरीच्या माध्यमातून केले असल्याचे सांगून गोदावरी अर्बनला शुभेच्छा दिल्या.महाराष्ट्र ही सहकार क्षेत्राची मातृभूमी आहे. ग्रामिण आणि कृषीच्या माध्यमातून सहकार चळवळ अधिक वृद्धींगत होईल.त्याचबरोबर रोजगार आणि विकासासाठी त्याचा जास्तीत जास्त उपयोग कसा करता येईल.याचा विचार व्हायला हवा.नांदेडला देखील एक्स्पोर्ट सेंटर भविष्यात होईल तसेच मराठवाड्यातही रस्त्याचे जाळे आणखी मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आहे.गोदावरी अर्बनच्या अध्यक्षा राजश्री पाटील यांनी प्रास्ताविक केले तर व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांनी आभार मानले
No comments:
Post a Comment