Sunday, January 26, 2020

बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध -पालकमंत्री धनंजय मुंडे.


– *मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात दिला विश्वास*

बीड, दि. 26 ——- बीड जिल्ह्याचा कृषि, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, आर्थिक, सांस्कृतिक, उद्योग व क्रीडा आदि विविध क्षेत्रांत चौफेर विकास होईल, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल, असा विश्वास देत जिल्ह्याची सर्वांगीण प्रगती होण्यासाठी जागरूक नागरिक म्हणून आपण सर्वांनी एकत्रित येऊन काम करु या, असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज येथे केले.

भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 70 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्षा शिवकन्या शिरसाठ, आमदार संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण धरमकर, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश आघाव पाटील, बीडचे उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर आदि उपस्थित होते.

नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी कर्जाच्या दृष्टचक्रात अडकलाय. अशा शेतकरी बांधवांसाठी राज्य शासनाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना घोषित केली आहे, असे स्पष्ट करून पालकमंत्री धनंजय मुंडे म्हणाले, कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी 30 जानेवारीपर्यंत आपले कर्जखाते आधारसंलग्न करुन घ्यावे. या योजनेच्या लाभापासून जिल्ह्यातील एकही पात्र शेतकरी वंचित राहू नये, यासाठी शासकीय यंत्रणांनी प्रयत्न करावेत व वेळापत्रकानुसार ही योजना पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे, असे त्यांनी सूचित केले.

पालकमंत्री धनंजय मुंडे म्हणाले, यापुढे भारताच्या संविधानातील उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयामुळे नागरिकांच्या मनात भारतीय संविधानातील मूलतत्वे, संवैधानिक हक्क आणि कर्तव्ये यांची रुजवणूक होऊन जबाबदार, सुजाण व सुसंस्कृत नागरिक घडविण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच, प्रत्येक सुजाण मतदाराने मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहनही त्यांनी केले.

जिल्ह्याला विकासाच्या नवीन पर्वाकडे नेण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने वाटचाल सुरू आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासासाठी अधिकाधिक निधी आणण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. सैन्यदल भरतीचा लाभ घेऊन देशसेवेसाठी योगदान देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. इंदु मिल येथील स्मारकामधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची एकूण उंची वाढवण्याच्या निर्णयाबद्दल सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा मंत्री म्हणून त्यांनी राज्य शासनाचे विशेष आभार व्यक्त केले. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना, शालेय विद्यार्थ्यांसाठी ई-लर्निंग यांचा उल्लेख करून प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेंतर्गत बीड जिल्ह्यातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीतवादन करण्यात आले. त्यानंतर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी परेड निरीक्षण करून मानवंदना स्वीकारली. पोलिस दल, गृहरक्षक दल, महिला पोलीस, होमगार्ड, एनसीसी, सैनिकी शाळा, स्काऊट गाईड, आरएसपी, शारीरिक शिक्षण महाविद्यालय यासह 17 प्लाटूननी संचलन करून त्यांना मानवंदना दिली. संचलनाचे नेतृत्त्व आष्टीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांनी केले. द्वितीय कमांडर म्हणून जी. वाय, शेख यांनी काम पाहिले. पोलीस वाहन वज्र, आरसीपी वाहन, महिला दामिनी पथक, रूग्णवाहिका, अग्निशमन दलाचे वाहन, सामाजिक वनीकरण विभागाचा चित्ररथ यांनी संचलनात सहभाग घेतला.

ध्वजारोहण कार्यक्रमानंतर जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर आधारीत सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, अधिकारी, कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, मान्यवर, विद्यार्थ्यांची भेट घेवून शुभेच्छा दिल्या. यावेळी विविध विभाग प्रमुख, आजी-माजी अधिकारी, पदाधिकारी, पालक, नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन श्रीमती संगिता धसे व ए. बी. शेळके यांनी केले.

No comments:

Post a Comment