Thursday, May 7, 2026

भूसंपादन मावेजा घोटाळा; तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक ताब्यात!

बीड (प्रतिनिधी) : भूसंपादन मावेजा घोटाळा प्रकरणात बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना बीड पोलिसांनी लातूर येथून ताब्यात घेतल्याची माहिती आहे. त्यांना आज लातूर न्यायालयात हजर केल्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी बीड येथे आणले जाणार असल्याचे समजते. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्यांना ताब्यात घेऊन बीडकडे रवाना होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या घटनेने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
बीड जिल्ह्यातील कथित भूसंपादन मोबदला घोटाळा प्रकरणात तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांचे नाव, पदनाम व स्वाक्षरी नमूद करून तब्बल १५४ भूसंपादन प्रकरणांमध्ये बनावट मोबदला आदेश तयार करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी भूसंपादन उपजिल्हाधिकारी सतीश धुमाळ यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात १० आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात सहाय्यक महसूल अधिकारी संजय हांगे, अविनाश चव्हाण (कंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर, भूसंपादन समन्वय कार्यालय), शेख अजहर शेख बाबू (कंत्राटी ऑपरेटर, भूसंपादन जायकवाडी प्रकल्प कार्यालय), त्रिंबक पिंगळे (सेवानिवृत्त कंत्राटी कर्मचारी, उपविभागीय अधिकारी कार्यालय बीड), पांडुरंग पाटील (सहाय्यक महसूल अधिकारी, भूसंपादन समन्वय कार्यालय), श्री. राऊत (राष्ट्रीय महामार्ग कार्यालय), अॅड. एस. एम. नन्नवरे, अॅड. नरवडकर, अॅड. पिसूरे आणि अॅड. प्रवीण राख यांचा समावेश आहे. या प्रकरणात संजय हांगे, त्रिंबक पिंगळे आणि शेख अजहर शेख बाबू या तिघांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणातील उर्वरित सात आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती आहे. या गुन्ह्याचा तपास सुरुवातीला पोलीस उपाधीक्षक पूजा पवार यांच्याकडे होता. मात्र त्या सध्या रजेवर असल्याने तपासाची जबाबदारी एम. व्यंकटराम यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. तपासादरम्यान आता तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनाही ताब्यात घेण्यात आल्याने या प्रकरणात मोठी घडामोड मानली जात आहे.

No comments:

Post a Comment