आष्टी (प्रतिनिधी): आष्टी शहरात गेल्या आठवड्याभरापासून जबरी चोरीच्या घटनांनी उच्छाद मांडला आहे. बुधवारी रात्री आष्टी दूध संघासमोर दुचाकीवरून जात असलेल्या दोन महिलांना पाठीमागून आलेल्या चोरट्यांनी अडवून त्यांच्या अंगावरील दागिने हिसकावून नेले. विशेष म्हणजे, सात दिवसांपूर्वी एकाच दिवशी तीन ठिकाणी अशाच प्रकारे चोरी झाली होती. एकापाठोपाठ एक घडणाऱ्या या घटनांमुळे शहरातील 'लाडक्या बहिणी' घराबाहेर पडताना भयभीत झाल्या आहेत.
रस्ते कामामुळे तपासात अडथळा
साबलखेड-आष्टी या राष्ट्रीय महामार्गाचे काम संथ गतीने सुरू असल्याने अनेक भागांतील सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. चोरट्यांना याची पूर्ण खात्री असल्याने ते बिनधास्तपणे महिलांना लुटत आहेत. कॅमेरे बंद असल्याने पोलिसांनाही चोरट्यांचा माग काढणे कठीण जात आहे.
गुन्हे दाखल, पण तपासाचे काय?
पोलिस दरवेळी गुन्हा दाखल करून घेतात, मात्र ठोस कारवाई होताना दिसत नाही. "तपास सुरू आहे" हे पालुपद ऐकून नागरिक आता वैतागले आहेत. चोरटे पोलिसांना उघडपणे आव्हान देत असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.
"सोनसाखळी चोरांचा शोध घेण्यासाठी एक अधिकारी आणि चार कर्मचाऱ्यांचे विशेष पथक तयार करण्यात आले आहे. तांत्रिक तपासाच्या साहाय्याने लवकरच या चोरांच्या मुसक्या आवळल्या जातील."
-शरद भुतेकर, पोलीस निरीक्षक, आष्टी.
No comments:
Post a Comment