Thursday, July 13, 2023

बीडजिल्हात १०० पेक्षा अधिक पूल धोकादायक प्रशासनाचे दुर्लक्ष.नागरिकांचा जीव धोक्यात.

बीड (कांतीकारी साथी न्यूज) : बीड जिल्ह्यात गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे अनेक पूल वाहून गेले. या पुलांची दुरूस्ती न केल्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय. मागच्या वर्षी जिल्ह्यातील तब्बल 100 पेक्षा जास्त पूलांचे नुकसान झाले होते. मात्र आजही त्याच पुलावरून नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधत यंत्रणांचे दुर्लक्ष नागरिकांच्या जीवावर बेतणार असल्याचे चित्र पाहायाला मिळत आहे. 
बीड जिल्ह्यात गेल्या वर्षी वडवणी तालुक्यातील पुसरा नदीवरील पूल पुराच्या पाण्यात वाहून गेला होता. एक वर्षापासून नागरिकांकडून सतत नवीन पूल बांधण्याची मागणी केली जात आहे. मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. या दुर्लक्षामुळे पहिल्याच पावसामुळे नदीला पूर आला आणि राहिलेला पुल पुरात वाहून गेला यात मोठा खड्डा पडला आहे. यामुळे पुसरा , तिगाव , चिंचाळा, हरिश्चंद्र पिंपरी, देवडी, काडी वडगाव, चिंचवडगाव, दुकडेगाव, कुप्पा, धानोरा, केंडे पिंपरी, परडी, माटेगाव, देवगाव, वंजारवाडी, नाईक तांडा आदी गावांसह वाड्या, वस्त्यांचा संपर्क तुटतो.

पावसाळ्यात थोडाही पाऊस झाला की पुसरा आणि तिगाव येथील पुलावरून पाणी वाहते. त्यामुळे जवळपास 13 गावांसह वाड्या, वस्त्यांचा संपर्क तुटतो . एवढी गंभीर अवस्था असतानाही पुलाची उंची वाढवणे तर दूरच, पण उखडलेले पूलही अद्याप दुरुस्त केले गेले नाहीत. त्यामुळे या पुलावरून एकादा जीव गेल्यावर प्रशासन जागे होईल का? असा सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केलाय. तुटलेले कठडे, रस्त्यावर पडलेले खड्डे, उखडलेला सिमेंटचा थर, उघड्या पडलेले पाईप यावरून या पुलाची अवस्था लक्षात येत आहे.

बीडच्या केज तालुक्यातील बनकरंजा गावासह इतर सहा खेड्यांना जोडणाऱ्या डांबरी रस्ता आणि पूल खचल्यामुळे लोकांना या ठिकाणावरुन येण्यासाठी आणि जाण्यासाठी समस्या येत आहेत. शासन एखादा जीव जाण्याची वाट पाहते का? असा प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे. फक्त बनकरंजा याच गावात नाही तर जिल्ह्यातील 100 च्या जवळपास पूल हे अतिवृष्टीने क्षतीग्रस्त झाले आहेत. मात्र जिल्हा प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

No comments:

Post a Comment