मुंबई (प्रतिनिधी) राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा येत्या काही दिवसांत होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यात 10 वी आणि 12 वीच्या परिक्षा केंद्रावर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी पूर्ण राज्यात “कॉपीमुक्त अभियान” राबविण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी यांनी यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादरीकरण केले. यावेळी कॉपीमुक्त अभियानाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय झाला. कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत संवेदनशील समजल्या जाणाऱ्या परीक्षा केंद्रांवर शक्यतेनुसार चित्रीकरण करण्यात येणार आहे.
या अभियानात राज्याचे “नोडल अधिकारी” म्हणून शिक्षण आयुक्त यांना व प्रत्येक जिल्हाधिकारी यांना तसेच “समन्वयक अधिकारी” म्हणून माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना नियुक्त करण्यात आले आहे. तसेच “कॉपीमुक्त अभियान”राबविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी व सर्व जिल्हा प्रशासनाने एकत्रित काम करावे. यासंदर्भात जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन जनजागृती करावी, अशा सूचाना देण्यात आल्या आहेत.
परीक्षेला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरु होण्याच्या प्रत्यक्ष वेळेपूर्वी अर्धा तास अगोदर हजर राहण्याबाबत विद्यार्थ्यांना सूचना देण्यात याव्यात. संवेदनशील समजल्या जाणाऱ्या परीक्षा केंद्रांवर शक्यतेनुसार चित्रीकरण करण्यात यावे असे ठरले आहे. यासाठी दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेला अतिसंवेदनशील, संवेदनशील, सर्वसाधारण असे परीक्षा केंद्रांचे वर्गीकरण करण्यात येणार आहे.
# जनजागृती मोहीम.
शिक्षक, मुख्याध्यापक, शैक्षणिक संस्थांचे प्रमुख यांच्या कार्यशाळा आयोजित करणे, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, कार्यकारी अधिकारी यांची जिल्हा दक्षता समिती नियुक्त करणे, माध्यमांव्दारे शाळा आणि पालकांशी संवाद साधणे यातून जनजागृती करण्यात येणार आहे.
# पोलिस बंदोबस्त.
परीक्षेवेळी पोलिस बंदोबस्तावरही भर देण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रापासून 50 मीटरच्या आत अनधिकृत व्यक्तीना प्रवेश देण्यात येणार नाही. अतिसंवेदनशील, संवेदनशील, सर्वसाधारण असे परीक्षा केंद्रांचे वर्गीकरण करण्यात यावे. कलम 144 अंतर्गत प्रतिबंधकात्मक आदेश देण्यात यावेत. 50 मीटरच्या आतील सर्व झेरॉक्स दुकाने बंद ठेवावीत, अशा सूचना देण्यात आल्या.
# या कालावधीत होणार परीक्षा .
राज्य शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी 2023 ते 21 मार्च 2023 तर दहावीची लेखी परीक्षा 2 मार्च 2023 ते 25 मार्च 2023 या कालवधीत होणार आहे.
No comments:
Post a Comment