Sunday, May 21, 2023

धक्कादायक ! बीड जिल्ह्यात 120 दिवसात 81 शेतकऱ्यांनी संपवले जीवन.

बीड (प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यात दीड दिवसाला एक शेतकरी आत्महत्या होत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. गेल्या चार महिन्यातील 120 दिवसात तब्बल 81 शेतकऱ्यांनी आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं आहे. कर्जबाजारीपणा, नापिकी आणि शेतमालाला भाव नसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असल्याचे चित्र, बीड जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. 

तर या 81 शेतकरी आत्महत्यांपैकी 33 शेतकरी आत्महत्या शासनाच्या मदतीसाठी पात्र ठरल्या आहेत. त्यापैकी केवळ एक आत्महत्याग्रस्त शेतकरी (Farmer) कुटुंबाला मदत मिळाली असून उर्वरित अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

आज घडीला शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही. कापूस अतिशय कमी दारात विक्री होत असून कांदा कवडीमोल भाव जात आहे. केलेला खर्च, बियाणांना आलेला खर्च, खत यासह मेहनत हे निघणं मुश्किल झालंय.

उलट आपल्या तळहाताच्या फोडसारखा जपून पिकवलेला कांदा विक्रीसाठी नेला असता तर त्या शेतकऱ्याच्या हातावर एक रुपया, दोन रुपये एवढेच नाही तर त्यांनाच त्या आडत दुकानदाराला पैसे देण्याची वेळ आलेली आहे. यामुळे शेतकरी उद्धवस्त झाला असून नैराश्येत जीवन जगत आहे.

 त्यात कर्जबाजारीपणा, मुलीचं लग्न, मुलांचे शिक्षण, आई वडिलांचे हॉस्पिटल नेमकं करावं कुठून? कुटुंब कसं चालवावं? असे एक ना अनेक प्रश्न या चिंताग्रस्त शेतकऱ्यांच्या डोक्यात घर करून आहेत. यामुळे बीड जिल्ह्यात शेतकरी आत्महत्याचे सत्र सुरूच आहेत. यामुळे मायबाप सरकार शेतकऱ्यांच्या शेतमालाला आता तरी भाव देणार का? असा संतप्त सवाल बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून केला जात आहे

No comments:

Post a Comment