माजलगाव (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेची शाळा म्हटलं की, तुटलेल्या , फुटलेल्या खिडक्या, फरश्या, परिसरात घाणीचे साम्राज्य, पत्ते खेळायची हक्काची जागा इतकंच काय तर काही महाभाग प्रातविधी अन् लघुशंकेसाठी शाळेच्या परिसराचा वापर करतात. परंतु हे चित्र बदलत असून लोक जागृत होत असल्याने जि.प. शाळेंनाही कार्पोरेट लुक येत आहे. यासाठी गावची गावं लोक सहभागातून करत आहेत. अंशी टाकरवण ( ता. माजलगाव ) येथील शाळेचा चेहरामोहरा बदलला असून, जिल्ह्यातील एकाही इंग्रजी शाळेत नसेल असा संगणक कक्ष बनवले असून शनिवारी ( दि. ४ ) याचा लोकार्पण सोहळा पार पडला आहे.
टाकरवण ( ता. माजलगाव ) येथे जिल्हा परिषदेची शाळा असून, पहिली ते चौथी २५० विद्यार्थी संख्या आहे. यासाठी ८ वर्ग खोल्या असून १० शिक्षक ज्ञानदानाचे कर्तव्य बजावत आहेत. परंतु प्रगतशील महाराष्ट्र शासनाच्या शाळा इमारतीची अवस्था कुपोषित बालका सारखी झालेली. विद्यार्थ्यांना शिक्षणात आवड निर्माण होण्यासाठी शाळेचा देखना व सुशोभित असणं आवश्यक असल्याचे मत शाळेचे मुख्याध्यापक रत्नाकर वाघमारे यांनी शाळा व्यवस्थापन समिती व सरपंच यांच्याकडे मांडले. यानंतर गावात शाळेसाठी लोकवर्गणी जमा करण्यास सुरुवात झाली. पहाता पहाता तब्बल १६ लाख रुपये अशी लोकवर्गणी गोळा झाली. या रकमेतून शाळेची पुर्ण डागडुजी, रंगरंगोटी करून शाळेला नवा साज करत शाळेची इमारत बोलकी केली. परिसरात जवळपास विविध प्रकारचे २०० झाडे लावण्यात आली. काळानुसार विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणासोबतच संगणकाचे ज्ञान मिळावे म्हणून तब्बल साडेसहा लाख रुपये खर्चून संगणक कक्ष तयार करण्यात आले. या कक्षाला कार्पोरेट लुक देण्यात आला. बीड जिल्ह्याचा विचार केला तर एखाद्या इंग्रजी शाळेत ही असा संगणक कक्ष नसेल अशी चर्चा करण्यात येत आहे. यामध्ये एकूण 16 संगणक असून यामुळे विद्यार्थ्यांना वायफायच्या माध्यमातून हायफाय शिक्षण मिळत आहे. या बदलत्या शाळेचे रुपडे पहाता जिल्हा परिषद शाळाही इंग्रजी शाळांना टफ देत असल्याचे चित्र आहे. परंतु यासाठी शाळेच्या शिक्षकांनी कामातून गावात आपली पत निर्माण करणं आवश्यक असल्याचे मत पालकांमधून व्यक्त केले जात आहे.
No comments:
Post a Comment