Thursday, March 23, 2023

माहेराहून साहित्य आणण्यासाठी सासरच्यांकडून छळ.विवाहितेने संपवले आयुष्य.

औसा (प्रतिनिधी) लग्नात जीवनावश्यक साहित्य दिले नसल्याच्या कारणावरून सतत होत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून विवाहितेने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. लातूर जिल्ह्यातील औसा शहरात ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी औसा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका मृताच्या नातेवाईकांनी घेतली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, रोहिणी हर्षद पाटोळे या विवाहितेला पती हर्षद पाटोळे, सासरा बालाजी पाटोळे, सासू विजयमाला पाटोळे आणि दीर रजनीकांत पाटोळे हे मानसिक त्रास देत होते. तुझ्या माहेरच्या लोकांनी लग्नात भांडे, पलंग, कपडे व संसारउपयोगी वस्तू काहीच दिल्या नाहीत, असे म्हणत तिला हिणवत होते.

पाडव्याच्या सणाला माहेरी जात असतानाही "रोहिणीला घेऊन जायचे असेल तर परत आणताना तिच्यासोबत संसार उपयोगी साहित्य गादी पलंग देणार असाल तर घेऊन जा अन्यथा घेऊन जाऊ नका," असे तिच्या सासरच्या मंडळींनी सुणावले होते.. 

यामुळे पिडित तरुणीने आत्महत्येचा मार्ग निवडला. सासरी परत आल्यानंतर रोहिणीच्या वडिलांना तिने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे फोन करुन सांगण्यात आले. परिस्थिती ठीक नसल्याने आणि सासरच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा आरोप मृत तरुणीच्या वडिलांनी केला आहे. या धक्कादायक घटनेनंतर मृताच्या नातेवाईकांनी आक्रमक होत आरोपीला अटक केल्याशिवाय प्रेत ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली आहे.

No comments:

Post a Comment