मुंबई – मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकारांतर्गत खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये 25 टक्के जागा वंचित दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात येतात. या २५ टक्के जागांसाठी राबविण्यात येणाऱ्या आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी आजपासून (१७ फेब्रुवारी) पालकांना अर्ज करता येणार आहे.
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले होते. त्यानुसार २५ जानेवारीपासून शाळांच्या नोंदणीला सुरुवात झाली. याआधी १ फेब्रुवारीपासून पालकांना ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी कळविण्यात आले होते. तथापि काही अपरिहार्य कारणास्तव आरटीई पोर्टलवर अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करता आली नव्हती. त्याऐवजी आता १७ फेब्रुवारीपासून अर्ज भरता येईल, असे सांगण्यात आले होते. मात्र त्यापूर्वी गोंदियामध्ये १६ फेब्रुवारीपासून दुपारी ३ वाजल्यापासून अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. तसेच अन्य जिल्ह्यांमध्ये १७ तारखेपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे, अशी माहिती आरटीईच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार, प्राथमिक शिक्षण संचालनालयाद्वारे खासगी शाळांमधील २५ टक्के जागांवर आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये आरटीईअंतर्गत प्रवेश मिळत असल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पालकांचे लक्ष आरटीई प्रवेश प्रक्रियेकडे लागलेले असते. यंदा आरटीई प्रवेशासाठी राज्यभरातील ९ हजार ४३१ शाळांमध्ये ९६ हजार ६२९ जागा आहेत. गेल्या २०२१-२२ च्या शैक्षणिक वर्षांकरिता आरटीई प्रवेशासाठी राज्यभरातून ९३ हजार ८०२ जागांसाठी २ लाख २२ हजार ५८४ अर्ज आले होते.
No comments:
Post a Comment