Friday, April 16, 2021

संचारबंदी काळात चहा, पाणी किंवा शक्य असल्यास पोलिसांना जेवण द्या, हेमंत नगराळेंचे जनतेला आवाहन.

 


मुंबईः राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता संचारबंदी लागू करण्यात आलीय. परंतु संचारबंदी असतानाही नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर दिसत आहेत. आता मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे (Hemant Nagrale) यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलिसांना मदत करण्याचं आवाहन केलंय. पोलिसांना शक्य तेवढी सगळी मदत करा, असं माझं जनतेला आवाहन आहे. चहा, पाणी किंवा शक्य असल्यास जेवणही त्यांना द्या. त्याच्याकडे नाही असं नाही, पण आपली आपुलकी समोर येईल, असंही हेमंत नगराळे म्हणालेत. 

नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून वागावे

राज्यात 15 दिवसांचा लॉकडाऊन सुरू आहे. अत्यावश्यक सेवा सुरू आहे. मागच्या वेळीपेक्षा हा लॉकडाऊन थोडा वेगळा आहे. नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून वागावे. रस्त्यावर कोणी यावे कोणी नाही, ह्याबाबत सूचना दिली गेली आहे. कोरोना यंदा भयंकर आहे. जे दिलेल्या सूचना पाळत नाही, उगाच बाहेर येत आहेत ते योग्य नाही. पोलीस सर्व घटनांवर लक्ष ठेवून आहेत. पोलीस आपली जबाबदारी पूर्ण करत आहेत. मागील वेळी 8000 पोलीस संक्रमित होते, आज 541 संक्रमित आहेत. एकूण 102 पोलीस मृत्युमुखी पडलेत, अशी माहिती त्यांनी दिलीय.

काय करायचं आणि काय नाही करायचं हे लोकांना सांगितलंय

ज्या गोष्टी करायच्या नाहीत, त्या लोकांनी करू नये, काय करायचं आणि काय नाही करायचं हे लोकांना सांगितलेलं आहे. पोलिसांना शक्य तेवढी सगळी मदत करा, असं माझं जनतेला आवाहन आहे. चहा, पाणी किंवा शक्य असल्यास जेवणही त्यांना द्या. त्याच्याकडे नाही असं नाही, पण आपली आपुलकी समोर येईल. कोणीही कडक पावलं उचलण्याची वेळ आणू नये, जर कोणाला समजत नसेल तर वेगळं पाऊल उचलावं लागेल. पोलिसांना जर कोणी शिव्या देत असेल ते योग्य नाही, असं कोणीही करू नये, असा इशाराही पोलीस आयुक्तांनी दिलाय.

50 पेक्षा जास्त वय असलेल्या पोलिसांना कार्यालयीन काम

कोरोनाची प्रकरण वाढत आहेत. म्हणून कडक लॉकडाऊनच्या सूचना आहेत. 50 किंवा 55 वर्षांच्या पोलिसांना सुट्टी दिली गेली होती. मात्र यंदा कोरोना जास्त वाढता आहे. म्हणून जास्त लोकांची गरज आहे. तरी देखील आम्ही 50 पेक्षा जास्त वय असलेल्या पोलिसांना कार्यालयीन काम दिलं आहे, असंही मुंबई पोलीस आयुक्तांनी सांगितलंय.

आम्ही रेल्वेच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी बोललोय

स्टेशनवर गर्दी जास्त होतेय, त्यासाठी आम्ही रेल्वेचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी बोललोय. अतिरिक्त पोलिस स्टाफ उपलब्ध करून दिलाय. लोकांनी अफवावर विश्वास ठेवू नये. कुठलाही मेसेज खात्री केल्याशिवाय फॉरवर्ड करू नये, असंही मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे म्हणालेत.

No comments:

Post a Comment