बीड : (प्रतिनीधी ) ऑनलाईन शिक्षणासाठी शेतकरी पित्याने टॅब घेऊन न दिल्याने, नाराज झालेल्या एका विद्यार्थ्याने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. अभिषेक राजेंद्र संत असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. गेवराई तालुक्यातील भोजगाव इथं ही थरारक घटना घडली. अभिषेकने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती.
सध्या खरीप हंगामाची लगबग सुरु आहे. पेरणी झाल्यावर टॅब घेऊन देतो, असं शेतकरी बापाने पोराला सांगितलं होतं. मात्र हताश झालेल्या आणि हट्ट धरलेल्या मुलाने धीर सोडून, थेट गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. ज्याच्यासाठी बाप शेतात राबराब राबतोय, त्याच पोराने आत्महत्या केल्याने शेतकरी बाप पुरता हडबडून गेला आहे.
अभिषेकने यंदा दहावीची परीक्षा दिली आहे. मात्र अद्याप निकाल आलेला नाही. राज्यभरात पुढील शिक्षणासाठी ऑनलाईन क्लासेस सुरु झाले आहेत. ऑनलाईन क्लासेससाठी अनेक ठिकाणी टॅब सक्तीचा किंवा कम्पलसरी आहे. अभिषेक हा शेतकरी कुटुंबातील होता. सध्या लॉकडाऊनमुळे सर्वांचीच आर्थिक अडचण आहे. अशातच बी बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे.
अभिषेकच्या वडिलांनीदेखील थोडं थांब पेरणी झाल्यावर उसनवारी करुन टॅब घेऊन देतो असं आश्वासन दिलं होतं. मात्र सध्या ऑनलाईन क्लास बुडत असल्याने हाताश झालेल्या अभिषेकने टोकाचे पाऊल उचलत, घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली.
याप्रकरणी गेवराई पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करुन पंचनामा केला. पुढील तपास गेवराई पोलीस तपास करीत आहेत
No comments:
Post a Comment