Thursday, June 25, 2020

परळीतील वीज ग्राहकांना मीटरवरील रिडिंगप्रमाणे विजेची देयके द्यावीत; - श्रीनिवास देशमुख.

परळी वैजनाथ, दि.25 (प्रतिनिधी):-
परळी शहर व परिसरातील वीज ग्राहकांना त्यांच्या मीटरवरील रिडिंगप्रमाणे वीज वितरण कंपनीने विजेची देयके द्यावीत अशी मागणी शरद पवार विचार मंचचे बीड जिल्हाध्यक्ष श्रीनिवास देशमुख यांनी केली आहे.
गुरूवारी (ता.25) वीज वितरण कंपनीच्या स्थानिक कार्यालयात कनिष्ठ अभियंता यांना दिलेल्या निवेदनात श्री देशमुख यांनी ही मागणी केली आहे. कोरोना मुळे गेल्या तीन महिन्यांपासून वीज ग्राहकांची मीटरवरील रिडिंग घेणे, देयके देणे ही कामे विस्कळीत झाली आहेत. त्यामुळे वीज बिलाच्या वसुलीसाठी वीज वितरण कंपनी वीज ग्राहकांना ऑनलाईन देयके देण्यास सुरूवात केली आहे. या देयकावर वीज वापर व प्रत्यक्ष मीटरवरील वीज बिलात मोठी तफावत आहे. अंदाजे युनिटचे बिल देयकावर टाकले आहे. यामुळे अनेक ग्राहकांना आव्वाचे सव्वा वीजेची बिले आली आहे. यामुळे ग्राहकांची मोठी गैरसोय होत असून अनेक ग्राहक वीज वितरण कंपनीच्या कारभाराबाबत संतप्त झाले आहेत. अगोदरच कोरोना मुळे सर्वसामान्य माणूस मोठ्या आर्थिक कोंडीत सापडलेला आहे. त्यातच विजेची आव्वाचे सव्वा बिले आल्याने या आर्थिक संकटात भर पडली आहे. वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी या प्रकरणी लक्ष घालून वीज ग्राहकांच्या मीटरवरील विजेचा वापर प्रत्यक्ष पाहून वीज ग्राहकांना बिले द्यावीत, गेल्या तीन महिन्यात ज्या ग्राहकांना बिल भरता आले नाही, त्यांना दंड, व्याज लावू नये अशी मागणी श्री देशमुख यांनी या निवेदनात केली आहे. वीज वितरण कंपनीच्या परळी येथील कार्यालयात चौकशी कक्ष स्थापन करून तिथे कायम कर्मचार्‍याची नेमणूक करावी, अनेक वर्षापासून बंद पडलेला या कार्यालयाचा दूरध्वनी सुरू करावा, एखाद्या भागातील वीज पुरवठा बंद करावयाचा असल्यास त्याबाबतची कल्पना वीज ग्राहकांना एसएमएस द्वारे द्यावी किंवा स्थानिक वर्तमानपत्रातून माहिती द्यावी तसेच यापूर्वी ज्यांना ग्राहकांना जास्तीची बिले आली आहेत त्या ग्राहकांच्या वीज बिलाची त्वरित दुरुस्ती करून द्यावी, वीज बिल स्वीकारण्यासाठी शहराच्या विविध विभागात वीज वितरण कंपनीने स्वतंत्र कक्ष स्थापन करावेत आदी मागण्याही या निवेदनात केल्या आहेत. यावेळी श्रीनिवास देशमुख यांच्यासह श्रीकांत माने व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment