Thursday, June 19, 2025

कष्टाचे नऊ लाख रुपये गेवराईतील छत्रपती मल्टिस्टेटमध्ये ठेवले दिवसभर बसूनही ठेवी दिल्या नाहीत.शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!


बीड (प्रतिनिधी) गेवराई तालुक्यातील खळेगाव येथील शेतकऱ्याने कष्टाचे नऊ लाख रुपये गेवराईतील छत्रपती मल्टिस्टेटमध्ये ठेवले होते. त्या ठेवी परत मिळाव्यात, यासाठी अनेकदा खेटे मारले. मंगळवारी दोघे नवरा-बायको दिवसभर कार्यालयाबाहेर बसले. पण, एक रुपयाही मिळाला नाही. रात्री पत्नी मल्टिस्टेटमध्येच झोपली, तर पतीने बुधवारी पहाटे मल्टिस्टेटच्या समोरच गळफास घेत आत्महत्या केली.

सुरेश आत्माराम जाधव (वय ४६, रा. खळेगाव, ता. गेवराई) या शेतकऱ्याने २०२० साली छत्रपती मल्टिस्टेटमध्ये ११ लाख ५० हजार रुपये ठेवले होते. मुलांच्या शिक्षणासाठी ही रक्कम काढण्यासाठी सुरेश जाधव हे गेल्या दोन वर्षापासून मल्टिस्टेटमध्ये चकरा मारत होते. मात्र, त्यांना पैसे दिले नाहीत. वारंवार पैसे मागूनही मिळत नसल्याने सुरेश जाधव यांनी बुधवारी पहाटे टोकाचे पाऊल उचलल्याची फिर्याद पत्नी कविता यांनी पोलिसांत दिली.

दोन मुलांसह नवरा-बायको दिवसभर ताटकळले.

पैशांसाठी सुरेश जाधव, पत्नी कविता, मुलगी साक्षी व मुलगा शुभम हे दिवसभर मल्टिस्टेटमध्येच बसून होते. रात्री कविता या तेथेच झोपल्या. तर सुरेश जाधव हे मुलांसोबत घरी गेले. सुरेश जाधव हे पहाटे ३ वाजेच्या सुमारास परत आले आणि त्यांनी मल्टिस्टेटसमोरील छताला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिस आल्यावर त्यांनी शटर वाजवून कविता यांना उठविले. पतीला लटकलेले पाहून त्यांनी हंबरडा फोडला.

६ महिन्यांपूर्वीही एकदा प्रयत्न.

साधारण सहा महिन्यांपूर्वीही पैशांसाठी सुरेश जाधव यांनी विषारी औषध प्राशन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी चेअरमन संतोष भंडारी यांनी त्यांना २ लाख ५० हजार रुपये दिले. उर्वरित २ लाख रुपये दोन महिन्यांत देतो म्हणाले होते.

संतोष भंडारीविरोधात गुन्हा दाखल.

छत्रपती मल्टिस्टेटचा चेअरमन संतोष ऊर्फ नाना बसंता भंडारी याच्या त्रासाला कंटाळून माझ्या पतीने आत्महत्या केल्याची फिर्याद कविता जाधव यांनी गेवराई पोलिस ठाण्यात दिली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक दीपक लंके हे करत आहेत.

No comments:

Post a Comment