गंगाखेड (प्रतिनिधी) : तालुक्यातील खळी पाटी जवळील गोदावरी नदी पुलाखाली नदीपात्रात साखर कारखान्यातील दुर्गंधी युक्त मळीचे घाण पाणी टाकल्या बाबत वृत्त प्रकाशित करताच महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण विभाग खडबडून जागे झाले. सोमवारी दुपारी खळी पाटी जवळील नदीपात्रात पाहणी करत पाणी नमुने तपासणीसाठी घेण्यात आले.
गंगाखेडच्या गोदावरी नदीपात्रात दुर्गंधीयुक्त मळीचे घाण पाणी
गंगाखेड ते परभणी महामार्गावर अज्ञात व्यक्तीने टँकरच्या माध्यमातून साखर कारखान्यातील दुर्गंधीयुक्त मळीचे घाण पाणी आणून टाकल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली. दुर्गंधीयुक्त घाण पाणी थेट गोदावरी नदी पात्रातील पाण्यात मिसळल्याने पाण्याचा रंग काळसर झाला. तसेच पाण्यातील जलचर आणि नदी काठावरील ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे वृत्त प्रसिध्द केले. या वृत्ताची दखल घेत महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण विभागातील सहाय्यक अधिकारी श्रीपाद कुलकर्णी, क्षेत्र अधिकारी नामदेव दारसेवाड, सय्यद महेबुब यांनी घटनास्थळी भेट दिली. पात्राची पाहणी करत मळी मिश्रित पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले. यावेळी खळी येथील ओमकार पवार, दुस्सलगाव येथील पोलीस पाटील सौ. संगीता कचरे, नसीर बेग आदींची उपस्थिती होती.
घाण पाणी टाकणार्याविरुध्द कारवाई करणार
गोदावरी नदीपात्रात दुर्गंधी युक्त मळीचे घाण पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. छत्रपती संभाजी नगर येथील प्रयोग शाळेत तपासणीसाठी नमुने पाठविण्यात येणार आहेत. याचा अहवाल प्राप्त होताच नदीपात्रात दुर्गंधी युक्ती मळीचे घाण पाणी टाकणार्या संबंधितावर कारवाई करण्यात येणार आहे. नदीपात्रात किंवा रस्त्याच्या कडेला अशा प्रकारे मळीचे घाण पाणी टाकणार्या टँकरची क्रमांकासही माहिती द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण विभागाचे क्षेत्र अधिकारी नामदेव दारसेवाड यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment