वसंत ठाकरे असं या जि. प.च्या मद्यपि शिक्षकाचं नाव आहे. उद्या (दि. २२) ग्रामपंचायतीमध्ये मासिक सभा असल्यानं सरपंच दिनेश वरखंडे हे शाळेतल्या समस्या जाणून घेण्यासाठी तिथं गेले होते. सरपंच वरखंडे यांनी ‘दुसरे एक शिक्षक कुठाय’, असं विचारलं असता ठाकरे हे शिक्षक बाकावर झोपलेले होते.
हा आवाज ऐकून शिक्षक ठाकरे तिथून उठले त्यांना याबाबत विचारणा केल्यावर शिक्षकाने सरपंच वरखंडे यांना ‘तुला सरपंचपदावर रहायचंय का’, असं म्हणत अर्वाच्च शब्दांत दमबाजी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
डहाणू तालुक्यातल्या धामणगाव आफठोलपाडा या जिल्हा परिषद शाळेतला वसंत ठाकरे हा शिक्षक. याप्रकरणी तलासरी पोलीस ठाण्यात शिक्षकाविरोधात सरपंच दिनेश वरखंडे यांनी तक्रार दाखल केली.
दरम्यान, जिल्हा परिषदेचे शिक्षक ठाकरेंचं हे वर्तन अत्यंत धक्कादायक असून गांवचे प्रथम ग्रामस्थ आणि धामणगावचे लोकप्रतिनिधी असलेल्या सरपंचाला एका मद्यपि शिक्षकानं केलेली मारहाण संतापजनक असल्याची ग्रामस्थांमधून चर्चा सुरु आहे.
या प्रकाराची पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दखल घेतील का? मद्यपि शिक्षक ठाकरेंना निलंबित करण्यात येणार का? मद्यपि शिक्षकाच्या मनोवृत्तीचा विद्यार्थ्यांच्या बालमनावर जो परिणाम होतोय, त्याला जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न यानिमित्तानं उपस्थित झाले आहेत.
जिल्हा परिषदेच्या शाळेत गरीब आणि मध्यमवर्गीय घरातली मुले शिक्षण घेताहेत. ही मुलं अत्यंत निरागस, निष्पाप आणि मातीच्या गोळ्याप्रमाणं असतात. यांच्यावर संस्कार करणार्या शिक्षकाच्या शिकविण्याच्या पध्दतीचा या मुलांवर प्रचंड प्रभाव असतो.
दुर्दैवानं या निरागस मुलांवर संस्कार करणारे शिक्षकच जर मद्यपि असतील तर या कोवळ्या मुलांच्या बालमनावर किती विपरित परिणाम होत असतील, याचा कोणी गंभीरपणे विचार करणार आहे की नाही, हा प्रश्न महत्वाचा प्रश्न आहे. मद्यपि शिक्षकानं सरपंचाला केलेल्या मारहाणीच्या या प्रकारानं पालकांसह ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
शिक्षक हा मातीच्या गोळ्याला आकार देणार्या कुंभाराप्रमाणं किंवा दगडातून देवाची मूर्ती घडविणार्या मूर्तीकाराप्रमाणं असतो. बालमनाच्या निरागस विद्यार्थ्यांवर संस्कार करुन तो भावी पिढी घडवत असतो. मात्र हाच शिक्षक जर दारु पिऊन शाळेतल्या एका खोलीत झोपत असेल आणि चौकशी करणार्या पदाधिकार्याला मारहाण करत असेल तर विद्यार्थ्यांवर कसे संस्कार होणार आणि त्या शाळेचा शैक्षणिक दर्जा काय असणार, हा मोठा गंभीर आणि चिंतनाचा विषय आहे.
या शाळेची पटसंख्या कमी आहे. शाळेत इयत्ता सातवीपर्यंतचे वर्ग आहेत. मुलं शाळेत होती मात्र ठाकरे हा शिक्षक दारु पिऊन शाळेच्या एका खोलीतल्या बाकावर झोपला होता. या चौकशी करणार्या सरपंचाला या शिक्षकाने मारहाण केली. त्यामुळे वसंत ठाकरे या शिक्षकाविरुध्द गुन्हा दाखल व्हायला हवा, त्या शिक्षकाविरुध्द कारवाई व्हायला हवी, अशी मागणी सरपंच वरखंडे आणि उपसरपंच विष्णू वांगड यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment