Wednesday, April 29, 2020

नीट आणी जेईई परीक्षा क्लासेस तयारीसाठी लातुरमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना सोडा.

* महाराष्ट्रातील पालकांची शासनाकडे मागणी . 

परळी  ;- (प्रतिनीधी ) लातूर येथे आरसीसी माटेगावकर आणि आयआयबी चौगुले या नीट आणि जेईई परीक्षेच्या तयारीसाठी प्रसिद्ध असलेल्या खाजगी क्लासेसमध्ये महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थी आणि पालक अडकले असून या विद्यार्थ्यांना आपापल्या गावी सोडण्यासाठी महाराष्ट्र शासनाने खास बाब म्हणून परवानगी द्यावी अशी मागणी कोल्हापूरसह अन्य जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या पालकांकडून होत आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की लातूर येथे सुप्रसिद्ध असलेले आरसीसी माटेगावकर आणि आयआयबी चौगुले यांचे नीट आणि जेईई परीक्षेचे खाजगी क्लासेस आहेत. या क्लासमध्ये महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गेल्या २४ मार्चपासून देशभरात लोकडाऊन असल्याने सर्व शिक्षण संस्था बंद आहेत. या लॉकडाऊनची तीव्रता माहित नसल्याने सुरुवातीला दुर्लक्ष केलेल्या पालकांनी आपल्या पाल्यांना परत आणण्यासाठी लातूरमध्ये धाव घेतली. पण लॉकडाऊनमुळे जिल्हाबंदी असल्याने हे पालक आपल्या पाल्यांना घेऊन परत येऊ शकत नाहीत.
सध्या लातूरमध्ये कोल्हापूर, सांगली, सातारासह राज्यासह संबंध  जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थी अडकून पडले आहेत. त्यांची राहण्या-जेवण्याची गैरसोय होत आहे. जिल्हाबंदी असल्याने त्यांना बाहेर पडता येत नाही. सध्या राजस्थानमधील कोटा येथील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्न करीत आहे. मात्र स्वतःच्या राज्यात असणाऱ्या लातूर मधील विद्यार्थ्यांना लातूर जिल्ह्यातुन बाहेर पडण्यासाठी आटापिटा करावा लागत आहे. तरी महाराष्ट्र शासनाने या विद्यार्थ्यांना आपल्या जिल्ह्यात परत जाण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी पालकांकडून होत आहे.

No comments:

Post a Comment