Friday, March 20, 2026

धारूर घाटात अपघात. ८ दिवसांत ६ वा भीषण अपघात; ट्रक-कार दरीत कोसळली ४ तरुण गंभीर जखमी.


धारूर (प्रतिनिधी) : धारूर घाटा तील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसून, बुधवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास पुन्हा एक भीषण अपघात घडला. वळणाचा अंदाज न आल्याने साखर वाहतूक करणाऱ्या ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या स्विफ्ट कारला (क्रमांक एमएच. ४७, एन. २३२०) जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दोन्ही वाहने सुमारे २०० फूट खोल दरीत कोसळली. या घटनेत एकूण ६ जण जखमी झाले असून, त्यातील केज येथील चौघांची प्रकृती गंभीर आहे.

साखर घेऊन जाणारा ट्रक (क्रमांक एमएच. ३८, डी. ६६८८) घाटातून उतरत असताना चालकाचा ताबा सुटला. नियंत्रण सुटलेल्या या ट्रकने केजकडे जाणाऱ्या व रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला जोराची धडक दिली. धडकेनंतर दोन्ही वाहने थेट दरीत कोसळली. अपघाताचा आवाज होताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. पोलिस आणि आपत्कालीन पथकाने क्रेन व दोरीच्या साहाय्याने जखमींना दरीतून बाहेर काढून तातडीने रुग्णालयात दाखल केले.

केजचे चार तरुण गंभीर जखमी.

या अपघातात कारमधील वसीम इनामदार, जफर पठाण, बबू शेख आणि सुलेमान शेख (सर्व राहणार केज) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचार सुरू असून एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. दोघांची नावे समजू शकली नाहीत.

‘डेथ ट्रॅप’ ठरतोय धारूर घाट.

धारूर शहराच्या पायथ्याशी असलेला हा ३ किलोमीटरचा घाट अत्यंत अरुंद आणि नागमोडी वळणांचा आहे. धक्कादायक बाब म्हणजे, मागील केवळ आठ दिवसांत या घाटात सहा अपघात झाले असून यात २० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. आजवर या घाटाने ५० पेक्षा अधिक जणांचा बळी घेतला आहे. प्रशासनाने येथे ठोस सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.

No comments:

Post a Comment