* जालना जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची माहिती.
जालना, दि. 16 :- जिल्ह्यात रास्तभाव दुकानांची विशेष तपासणी मोहिम राबविण्यात आली. प्राप्त चौकशी अहवालामध्ये दोषी आढळून आलेल्या मंठा, अंबड व घनसावंगी तालुक्यातील प्रत्येकी एक अशा तीन रास्तभाव दुकानाचे प्राधिकारपत्र निलंबित करण्यात आले असून नऊ रास्तभाव दुकानाच्या प्राधिकारपत्राची अनामत जप्त करण्यात येऊन १० हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.
राज्यात तसेच जिल्ह्यात कोरोना विषाणुमुळे उद्भवणाऱ्या संसर्गजन्य परिस्थिती उद्भवल्यामुळे शासनाकडून अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटूंब लाभार्थी योजना, एपीएल शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थी योजना या नियमित योजनांसोबतच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना व प्राधान्य कुटूंब लाभार्थी व्यतिरिक्त (एनपीएच) तसेच डाळीचे नियतन मंजूर करण्यात आले आहे. यानियतनाचे लाभार्थ्यांना योग्य पद्धतीने वितरण होण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या निर्देशानुसार उपजिल्हाधिकारी, तहसिलदार व नायब तहसिलदार यांच्यामार्फत जिल्ह्यात रास्तभाव दुकानांची विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली. या मोहीमेमध्ये दि. 8 ते 15 मे दरम्यान प्राप्त चौकशी अहवालामध्ये दोषी आढळून आलेल्या मंठा, अंबड व घनसावंगी तालुक्यातील प्रत्येकी एक अशा तीन रास्तभाव दुकानाचे प्राधिकारपत्र निलंबित करण्यात आले असून नऊ रास्तभाव दुकानाच्या प्राधिकारपत्राची अनामत जप्त करण्यात येऊन १० हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. चालु महिन्यासुद्धा नियमित रास्तभाव दुकानांच्या तपासण्या करण्यात येत असून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील सर्व रास्तभाव दुकानदारांनी शासनाकडून मंजुर करण्यात आलले नियतन नियमानुसार व तातडीने वितरित करण्याची कार्यवाही पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिले असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी रिना बसैय्ये यांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment