Friday, December 16, 2022

शेतकर्‍यांसाठी खूशखबर!; अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी दुप्पट रक्कम मिळणार!


बीड : जुन ते ऑक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकर्‍यांना मोठा फटका बसला होता. मात्र आज शिंदे-फडणवीस सरकारने शेतकर्‍यांना दिलासा दिला असून जिरायत पिकाच्या नुकसानीपोटी 13 हजार 600 रूपये तर बागायत पिकांच्या नुकसानीपोटी 27 हजार रूपये मिळणार आहेत. तर बहुवार्षिक नुकसानीसाठी 36 हजार रूपये मिळणार असून या संदर्भात हिवाळी अधिवेशनात  निधीची तरतुद होणार आहे.

जून ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यातील विविध जिल्ह्यात झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी वाढीव दराने मदत देण्याबाबत सरकारने शासन निर्णय घेतला आहे. शासन निर्णयानुसार, जिरायत पिकाच्या नुकसानीसाठी 6 हजार 800 रुपयांऐवजी 13 हजार 600 रुपये मिळणार आहेत, तर बागायत पिकाच्या नुकसानीसाठी 13  हजार 500 ऐवजी आता 27  हजार रुपये मिळणार आहेत. तसेच, बहुवार्षिक पिकाच्या नुकसानीसाठी 18 हजार ऐवजी आता मिळणार 36 हजार रुपये मिळणार आहेत.

शेतकर्‍यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून नुकसानीसाठी 22232.45 लाख रुपये इतका निधी वितरीत करण्यास सरकारने मंजूरी दिली आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात या निधीची तरतूद पुरवणी मागण्याद्वारे करण्यात येईल. त्यानुसार हा निधी विभागीय आयुक्तांना किंवा शासनाचे आदेश येतील त्याप्रमाणे वितरित करण्याचे आदेश दिले जाणार आहेत. सरकारनं नुकसानीची मर्यादाही वाढवली आहे. दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत मिळणार असल्याचे या शासन निर्णयात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment