उस्मानाबाद (प्रतिनीधी) कोविड-19 आजारापासून सरंक्षण होण्यासाठी मास्क,सॅनिटायझरचा वापर,हात वारंवार स्वच्छ धुणे,सुरक्षित अंतर पाळणे, या बाबी सोबतच कोविड-19 प्रतिबंधक लस हा उत्तम पर्याय उपलब्ध आहे.ही लस घेतल्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग होण्यापासून संरक्षण मिळतेच पण यदाकदाचित संसर्ग झालाच तर कोविड -19 आजाराची तिव्रता अत्यंत कमी राहते. जिल्हयाने 12 ते 14 वर्षे वयोगटातील कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाचा  दुसरा डोस देण्यात राज्यात दुसरा क्रमांक पटवली आहे, याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी संबंधित यंत्रणेचे कौतुक केले आहे.

 या लसीमुळे न्युमोनिया किंवा मृत्यू टाळता येतो.या धर्तीवर उस्मानाबाद जिल्हयामध्ये 16 जानेवारी 2021 पासून या लसीकरणाला सुरूवात झाली आणि या अंतर्गत वेगवेगळया टप्यांमधून आरोग्य कर्मचारी,फंटलाईन वर्कर,ज्येष्ठ नागरिक,दुर्धर आजारी नागरिक 45 वर्षावरील नागरिक आणि त्यानंतर 18 वर्षे वयावरील सर्व नागरिकरिता लसीकरण सुरू करण्यात आले होते. त्यानंतर 09 जुलै 2021 पासून प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानच्या माध्यमातून स्तनदा माता आणि गरोदर मातासाठी कोविड-19 लसीकरणास सुरूवात झाली दि.3 जानेवारी 2022 पासून 15-18 वयोगटासाठी लसीकरणास सुरूवात झाली,तसेच दि.17 मार्च 2022 पासून 12-14 वयोगटासाठी लसीकरणास सुरूवात झाली.

जिल्हयात 12 ते 14 वयोगठातील कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीचा 40204 बालकांना पहिला आणि 14962 बालकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.दुसरा डोस देण्याच्या कामात जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे,याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दि.27 एप्रिल 2022 रोजी दूरदृष्य प्रणालीव्दारे घेतलेल्या कोविडविषयक आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर,मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता आणि सर्व जिल्हास्तरीय विभागप्रमुख यांचे कौतूक केले आहे.

उस्मानाबाद जिल्हयातील सर्व वयोगटातील एकंदरीत कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरण कामाचा आढावा घेतला असता, जिल्हयातील पात्र लाभार्थ्यापैकी 83.28 टक्के लाभार्थ्यांनी पहिला डोस घेतला आहे.दुसरा डोस जिल्हयातील पात्र लाभार्थ्यांपैकी 61.33 टक्के लाभार्थ्यांनी घेतला आहे.जिल्हयातील 2,45,000 पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांनी अद्यापही दुसरा डोस घेतलेला नाही.त्यामुळे देय असलेल्या लाभार्थ्यांनी तात्काळ दुसरा डोस घेवून संरक्षित होणे आवश्यक आहे. देशात आणि राज्यात कोविडची चौथी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञानी वर्तविलेली आहे.त्या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद जिल्हयातील सर्व सामान्य जनतेला कोव्हीड-19 या आजारापासून संरक्षण मिळावे आणि जिल्हा कोविडमुक्त व्हावा  असा हेतू आहे. त्यामुळे पालकमंत्री शंकरराव गडाख,जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता यांनी उस्मानाबाद जिल्हयातील सर्व पात्र 12 ते 14 आणि 15 ते 18 वयोगटातील तसेच 18 वर्षावरील पात्र असणारे सर्व नागरिकांनी त्यांना देय असलेला पहिला किंवा दुसरा डोस लवकरात लवकर घेवून लसीकरण पूर्ण करण्याबाबत आवाहन केले आहे.

राज्यातील उच्चांकी 12 ते 14 वयोगटातील लसीकरणाचे दुसऱ्या डोसबाबत सत्रांचे अयोजन,नियोजन आणि शिस्तबध्द पध्दतीने दिलेल्या सेवेसाठी  जिल्हाधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा आरोग्य अधिकारी,जिल्हा शल्यचिकित्सक,जिल्हा प्रजनन तसेच बाल आरोग्य अधिकारी,निवासी वैद्यकीय अधिकारी बाहयसंपर्क श्क्षिणाधिकारी (माध्यिमिक व प्राथमिक) च्या मार्गदर्शनाखाली जिल्हयातील सर्व वैद्यकीय अधीक्षक,तालुका आरोग्य अधिकारी, गटशिक्षणाधिकारी,वैद्यकीय अधिकारी,समुदाय आरोग्य अधिकारी,आरोग्य कर्मचारी, शिक्षक तसेच पोलिस प्रशासन,महसूल,गटविकास अधिकारी,महिला व बाल विकास विभाग यांनी विशेष सहभाग नोंदविला आहे.यापुढेही आयोजित करण्यात येणाऱ्या कोव्हीड-19 प्रतिबंधात्मक लसीकरण सत्रांचा लाभ घेवून जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे,असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.