मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील काही भागांची पाहणी केली. या दौय्रानंतर पवार यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. त्यामध्ये पवार यांनी आजच्या दौय्राबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे.
आज तुळजापूर परिसरातील काक्रंबावाडी, लोहारातील सास्तुर, राजेगांव, उमरग्यातील कवठा, औसा तालुक्यातील उजनी, उस्मानाबादमधील पाटोदा, करजखेडा या गावांना भेटी देऊन अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी गावकऱ्यांशी संवाद साधला.
एखाद्यावेळी अतिवृष्टी, दुष्काळ, रोगराई येते तेव्हा पीक जातं, पण ते त्यावर्षीचं पीक जातं. पण यावेळचं जे संकट आहे त्यामुळे जमिनीची जी अवस्था झालेली आहे त्यात त्यावर्षीचंच पीक नाही तर पुढची काही वर्षे पीकच घेता येत नाही. आतिवृष्टीचे हे संकट संपूर्ण शेतीव्यवस्था आणि अर्थव्यवस्था उद्धवस्त करणारे संकट आहे.
जमीन खरवडून गेली. त्यामुळे या नुकसानाचे स्वरूप हे नेहमीपेक्षा मोठे आहे. याशिवाय काही ठिकाणी कुणाच्या विहिरी होत्या, कुणाच्या पाईपलाइन होत्या, कुणी ठिबक सिंचन व्यवस्था केली होती. अन्य काही साधनं होती, तीदेखील वाहून गेली. घरातील समानसुमानसुद्धा वाहून गेलं. या परिस्थितीतून आपल्याला काही ना काही तरी मार्ग काढावा लागेल.
आपण राज्य सरकार आणि केंद्र सरकारशी बोलू. एकंदर नुकसानाचे स्वरूप पाहिलं तर या सर्व परिस्थितीला एकटे राज्य सरकार तोंड देऊ शकणार नाही असं मला वाटतं. याठिकाणी केंद्राकडून मदत मिळालीच पाहिजे. आपण आपल्या लोकप्रतिनिधींना घेऊन राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाच्या संबंधित प्रतिनिधींशी बोलू असं पवार यांनी म्हटलं आहे.
No comments:
Post a Comment